Join us  

"मुंबईकर कधीच निराश करत नाहीत...", भव्य-दिव्य स्वागत सोहळ्याने रोहित शर्मा झाला भावुक

Rohit Sharma Mumbai Welcome, T20 World Cup 2024: रोहित आणि टीम इंडियाचे मुंबईत मोठ्या जल्लोषात स्वागत झाले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 12:36 PM

Open in App

Rohit Sharma, T20 World Cup 2024, Mumbai Wankhede Stadium: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर काल अभूतपूर्व गर्दी दिसून आली. क्रिकेट चाहत्यांच्या उत्साहाने स्टेडियम पूर्ण भरून गेले होते. २०२४च्या T20 विश्वचषकात टीम इंडियाने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी चाहते येथे जमले होते. BCCIने भारतीय संघाला १२५ कोटी रुपयांच्या बक्षिसाचा धनादेश सुपूर्द केला. या सत्कार समारंभात विराट कोहली, रोहित शर्मा, राहुल द्रविड आणि जसप्रीत बुमराह यांनी आपल्या भावना क्रिकेट चाहत्यांसोबत शेअर केल्या. यावेळी रोहितने मुंबईचे आणि मुंबईकरांचे मनापासून आभार मानले आणि कौतुक केले.

रोहित शर्माने केलं मुंबईचं कौतुक!

"मुंबई कधीही निराश करत नाही. आमचे जोरदार स्वागत झाले. संघाच्या वतीने आम्ही चाहत्यांचे आभार मानतो. विजयानंतर आता मला खूप आनंद वाटतो आहे. सर्वात खास क्षण तो होता जेव्हा भारतीय कर्णधार म्हणून मी T20 विश्वचषक उंचावला. फायनलमध्ये शेवटचे षटक टाकल्याबद्दल आणि भारताच्या विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल हार्दिक पांड्याचेही विशेष कौतुक. शेवटचे षटक टाकल्याबद्दल त्याला सलाम. तुम्हाला कितीही धावांची गरज असली तरी ते षटक टाकण्यासाठी नेहमीच खूप दडपण असते. त्याने ते करून दाखवले त्यासाठी त्याचे कौतकच आहे," असे रोहित शर्मा म्हणाला.

दरम्यान, या सोहळ्यानंतर खेळाडूंनी चाहत्यांशी संवाद साधला, त्यांना सह्या दिल्या आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढले. स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या लोकांना खूप आनंद झाला. मरीन ड्राईव्ह येथून T20 विश्वचषक विजेत्या संघाच्या विजय परेडने जल्लोषाची सुरुवात झाली, ती वानखेडे स्टेडियमवर संपली. या वेळेत लाखो क्रिकेट चाहते मरिन ड्राइव्ह आणि वानखेडे स्टेडियमवर जमले आणि जल्लोष केला.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024रोहित शर्मामुंबईभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ