Join us  

SL vs IND Live : THE SKY SHOW! भारतीय कर्णधाराची जोरदार फटकेबाजी; पंतसह गिलही 'यशस्वी'

SL vs IND 1st T20 Live : भारतीय संघाने श्रीलंकेला विजयासाठी तगडे आव्हान दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 8:47 PM

Open in App

SL vs IND 1st T20 Match Score Live Updates In Marathi | पल्लेकले : ट्वेंटी-२० मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय फलंदाज यजमान गोलंदाजांवर तुटून पडले. सलामीवीर यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि रिषभ पंत यांनी स्फोटक खेळी केली. सूर्याने अर्धशतकी खेळी करून भारताची धावसंख्या २०० पार पोहोचवली. त्याने २ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने २६ चेंडूत ५८ धावांची स्फोटक खेळी केली. याशिवाय रिषभ पंतने १ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ३३ चेंडूत ४९ धावा कुटल्या.

श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वाल (४०) आणि शुबमन गिल (३४) यांनी चांगली सुरुवात केली. दोघांनीही स्फोटक खेळी करत भारताला मजबूत स्थितीत पोहोचवले. मात्र, संघाची धावसंख्या ७४ असताना टीम इंडियाला गिलच्या रूपात पहिला झटका बसला. त्याला दिलशान मदुशंकाने बाद केले. मग त्याच्या पुढच्या षटकात यशस्वी जैस्वाल वानिंदू हसरंगाची शिकार झाला. चांगल्या लयनुसार खेळत असलेल्या यशस्वीला बाद करण्यात वानिंदू हसरंगाला यश आले. जैस्वालने २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने २१ चेंडूत ४० धावा कुटल्या. अखेर भारतीय संघ निर्धारित २० षटकांत ७ बाद २१३ धावा करू शकला.

भारताकडून यशस्वी जैस्वाल (४०), शुबमन गिल (३४), सूर्यकुमार यादव (५८), रिषभ पंत (४९), हार्दिक पांड्या (९), रियान पराग (७), रिंकू सिंग (१), अक्षर पटेल (नाबाद १०) आणि अर्शदीप सिंगने नाबाद १ धाव केली. भारतीय गोलंदाजांना रोखण्यात श्रीलंकेकडून मथीशा पथिरानाने मोठे योगदान देताना सर्वाधिक चार बळी घेतले, तर दिलशान मदुशंका, असीथा फर्नांडो आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. 

भारताचा संघ -सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, रिषभ पंत, रियान पराग, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.

श्रीलंकेचा संघ -चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल मेंडिस, कुसल परेरा, कांमिदू मेंडिस, वानिंदू हसरंगा, दासुन शनाका, महीश थीक्ष्णा, मथीशा पथिराना, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका. 

दरम्यान, भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत २९ ट्वेंटी-२० सामने खेळले गेले आहेत. यापैकी टीम इंडियाने १९ सामने जिंकले, तर श्रीलंकेला फक्त ९वेळा विजय मिळवता आला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात शेवटच्या वेळी जानेवारी २०२३ मध्ये ट्वेंटी-२० मालिका झाली होती. भारताने ही मालिका २-१ ने जिंकली होती. त्यानंतर भारताने मायदेशात खेळलेल्या मालिकेतही श्रीलंकेचा धुव्वा उडवला. 

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकासूर्यकुमार अशोक यादवरिषभ पंतयशस्वी जैस्वालभारतीय क्रिकेट संघ