Join us  

आता बस्स झालं! वर्ल्ड कपपर्यंत विराट, रोहितला विश्रांतीच देऊ नका; सुनील गावस्कर संतापले

सलग दोन वर्ल्ड कप स्पर्धांसाठी सातत्याने संघात प्रयोग करूनही भारतीय संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उंचावला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 4:07 PM

Open in App

सलग दोन वर्ल्ड कप स्पर्धांसाठी सातत्याने संघात प्रयोग करूनही भारतीय संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उंचावला नाही. भारताने जवळपास ४४ खेळाडूंची चाचपणी केली, तरीही अंतिम १५ खेळाडू निवडताना निवड समितीकडून चुका व्हायच्या त्या झाल्याच. आताही २०२३मध्ये भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कपस्पर्धेपूर्वी भारतीय संघ १९ वन डे सामने खेळणार आहे आणि अंतिम १५ जणांमध्ये स्थान पटकावण्याच्या शर्यतीत ३०+ खेळाडू आहेत. पण, भारतीय व्यवस्थापनाच्या या प्रयोगावर आता माजी फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनी मोलाचा सल्ला दिला आहे. वर्क लोडच्या नावावर दिल्या जाणाऱ्या ब्रेकवर गावस्करांनी टीका केली आहे.

 मिशन २०२३ वर्ल्ड कप! २१ सामने अन् १५ जागांसाठी ३१ खेळाडू शर्यतीत 

भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे आणि या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल आदी सीनियर खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. त्यामुळे युवा खेळाडूंना संधी मिळतेय. संघात सातत्याने होत असलेले बदल यावर गावस्करांनी नाराजी व्यक्त केली आहे. २०२३च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून संघ व्यवस्थापनाने आतापासून विचार करायला हवा, असा सल्ला त्यांनी दिलाय. ''फलंदाजी विभागाची काळजी घ्यायला हवी. आता वन डे वर्ल्ड कप स्पर्धेला वर्षाहून अधिक कालावधी राहिला आहे. त्यामुळे या कालावधीत फलंदाजांना विश्रांती द्यायला नको. मर्यादित षटकांच्या सामन्यात फलंदाजांमधील एकमेकांवरील विश्वास महत्त्वाचा आहे. त्यासाठी एकमेकांना आत्मविश्वास देणे गरजेचे आहे आणि हे सर्व केव्हा होईल, जेव्हा ते सातत्याने सोबत खेळतील,''असा सल्ला गावस्करांनी दिला.   

टॉप ऑर्डर ते गोलंदाजी सगळीकडे चुरसवन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी अंतिम संघ जाहीर करण्यापूर्वी भारतीय संघ २१  वन डे सामने खेळणार आहे. २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघाने ४४ खेळाडूंची चाचपणी केली आणि आता त्यापैकी ३१ खेळाडू अजूनही शर्यतीत आहेत. यापैकी १४ खेळाडू हे शिखर धवनच्या मार्गदर्शनाखाली न्यूझीलंड दौऱ्यावर खेळत आहेत. रोहित शर्मा बांगलादेश दौऱ्यावर पुनरागमन करणार आहे.

२०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारताने सर्व लक्ष ट्वेंटी-२० वर्ल्ड कपवर केंद्रीत केले होत. त्यामुळेच मागील साडेतीन वर्षांत भारतीय संघ ३९ वन डे सामने खेळला आहे. या कालावधीत भारताचे ६ खेळाडूच २० पेक्षा अधिक वन डे सामने खेळले. तरीही भारतीय संघ अजूनही तगडा १५ जणांचा संघ निवडीपासून दूर आहेच. वर्ल्ड कपनंतर १३ मालिकांमध्ये ४४ खेळाडूंना संधी दिली गेली आणि त्यामध्ये धवन हा ३०पेक्षा जास्त सामने खेळणारा एकमेव खेळाडू आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबीसीसीआय
Open in App