Join us  

भारत सरकारने राहुल द्रविडला 'भारतरत्न' देऊन सन्मानित करायला हवे - सुनिल गावस्कर

भारताने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून विश्वचषक उंचावला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2024 2:17 PM

Open in App

T20 World Cup 2024 : विश्वविजेता भारतीय संघ मायदेशात पोहोचताच भारतीय संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले. दिल्ली विमानतळावर चाहत्यांनी टीम इंडियाची झलक पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. त्यानंतर भारतीय संघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी गेला. मग मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात व्हिक्टी परेड काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने चाहत्यांनी उपस्थिती दर्शवली. अखेर क्रिकेटची पंढरी असलेल्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी कर्णधार रोहित शर्मासह इतर सर्वच खेळाडू थिरकल्याचे पाहायला मिळाले. बीसीसीआयने खेळाडूंना १२५ कोटी रूपयांचे बक्षीस दिले. भारताच्या या यशानंतर माजी खेळाडू सुनिल गावस्कर यांनी एक मोठी मागणी केली आहे. 

कर्णधार रोहित शर्मासह संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा भारताच्या विजयात मोठा हात आहे. पडद्यामागील हिरो म्हणून त्यांनी चोख कामगिरी पार पाडली. दरम्यान, भारत सरकारने राहुल द्रविड यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करायला हवे, अशी मागणी दिग्गज सुनिल गावस्कर यांनी केली. ते म्हणाले की, क्रिकेटवेड्या आपल्या देशाने द्रविड यांना कृतज्ञतापूर्वक संस्मरणीय निरोप दिला. भारत सरकारने त्यांचा भारतरत्न देऊन गौरव केला तर ते योग्य ठरेल. याला कारणही खूप मोठे आहे. द्रविड हा एक महान खेळाडू आहे. त्याने राष्ट्रीय संघाचा कर्णधार म्हणून वेस्ट इंडिजमध्ये प्रसिद्ध मालिका जिंकली. तो विजय खूप महत्त्वाचा होता. इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकणाऱ्या तीन भारतीय कर्णधारांपैकी द्रविड एक आहे. प्रशिक्षक म्हणून त्याने संघाला चांगले मार्गदर्शन केले. त्यामुळे मला वाटते की, भारत सरकारने भारतरत्न देऊन द्रविडचा सन्मान करायला हवा. भारतरत्न, राहुल शरद द्रविड हे असे बोलायलाही खूप छान वाटते. वृत्तसंस्था 'Mid-Day' साठी लिहिलेल्या लेखात गावस्करांनी ही मागणी केली. 

दरम्यान, विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात भारताने सात धावांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. यासह तमाम भारतीयांना जल्लोष करण्याची संधी मिळाली. २०१३ नंतर भारताने प्रथमच आयसीसीचा किताब जिंकला आहे. भारताला वन डे विश्वचषकात अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. पण, यावेळी रोहितसेनेने ट्रॉफीवर कब्जा केला. दरम्यान, २०१३ नंतर टीम इंडियाने पहिली आयसीसी ट्रॉफी उंचावताना दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये पराभूत केले. संपूर्ण स्पर्धेत थंड पडलेली विराट कोहलीची बॅट फायनलमध्येच तळपली. अक्षर पटेलने मॅच विनिंग अष्टपैलू कामगिरी केली. २००७च्या वर्ल्ड कपमध्ये खेळाडू म्हणून वर्ल्ड कप उंचावणारा युवा रोहित, २०२४ मध्ये कर्णधार म्हणून जेतेपदाचा चषक उंचावताना भावनिक झालेला जगाने पाहिला. 

टॅग्स :राहुल द्रविडभारतरत्नसुनील गावसकरभारतीय क्रिकेट संघट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024