Join us  

IPL खेळताना थकवा येत नाही, देशासाठी खेळायच्या वेळी विश्रांती हवी?; सुनील गावस्करांनी वरिष्ठ खेळाडूंचे टोचले कान  

विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि रिषभ पंत यांना आगामी वेस्ट इंडिजविरूद्ध दौऱ्यातील वन डे मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 10:25 PM

Open in App

नवी दिल्ली : ‘आयपीएलमध्ये ब्रेक न घेता खेळता, मात्र देशाकडून खेळताना एका मालिकेनंतर वर्कलोडचे कारण पुढे करत विश्रांती का घेता?’ असा खोचक प्रश्न माजी दिग्गज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनी टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंना मंगळवारी केला. विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि रिषभ पंत यांना आगामी वेस्ट इंडिजविरूद्ध दौऱ्यातील वन डे मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. नेमक्या याच गोष्टीवरून गावस्कर यांनी या खेळाडूंची चांगलीच कानउघाडणी केली.

‘स्पोर्ट्स तक’शी बोलताना गावस्कर म्हणाले, ‘मी खेळाडूंना विश्रांती देण्याशी मुळीच सहमत नाही. तुम्ही आयपीएल खेळताना विश्रांती घेत नाही, मग देशासाठी खेळतेवेळी तुम्हाला विश्रांती का हवी?. तुम्हाला देशासाठी खेळावेच लागेल. विश्रांतीची मागणीदेखील करू नका. ट्वेंटी-२० हा केवळ २० षटकांचा सामना. याचा तुमच्या शरीरावर कुठलाही विपरीत परिणाम होत नाही.’

‘कसोटी सामन्याचा मानसिकतेवर आणि शरीरावर परिणाम होतो, हे मी समजू शकतो. मात्र टी-२० मुळे काही समस्या जाणवत असेल, असे वाटत नाही. बीसीसीआयने विश्रांती धोरणात हस्तक्षेप करावा. ग्रेड ‘अ’मध्ये असलेल्या खेळाडूंना मोठ्या रकमेचे करार मिळाले. त्यांना प्रत्येक सामन्यासाठी चांगली रक्कम मिळते. सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालकांना इतक्या सुट्या देणारी एकतरी कंपनी आहे का? ’असा सवालदेखील गावसकर यांनी उपस्थित केला.

टॅग्स :सुनील गावसकरबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघविराट कोहलीरोहित शर्मा
Open in App