Sunil Gavaskar Angry: इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने भारत- इंग्लंड यांच्यातील द्विपक्षीय कसोटी मालिकेत दिली जाणारी पतोडी ट्रॉफी निवृत्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी निर्णयावर जोरदार टीका केली आहे. ईसीबीकडे संवेदनशीलता आणि ऐतिहासिक गोष्टींचा आदर बाळगण्याचा अभाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भारत-इंग्लंड कसोटी क्रिकेटच्या ७५ व्या वर्षाच्या निमित्ताने २००७मध्ये सुरू करण्यात आलेली पतोडी ट्रॉफी इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या द्विपक्षीय कसोटी मालिकेतील विजेत्या संघाला देण्यात येते. आगामी जून-जुलै २०२५ मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी ईसीबीने ही ट्रॉफी निवृत्त करण्याची योजना आखल्याचे वृत्त होते.
स्पोर्टस्टारमधील स्तंभात गावसकर यांनी लिहिले की, 'निवृत्त होणाऱ्या खेळाडूंच्या नावावर असलेल्या ट्रॉफीबद्दल पहिल्यांदाच ऐकले आहे. यावरून पतोडींनी इंग्लंड आणि भारत या दोन्ही देशांत क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल संवेदनशीलता बाळगण्याची ईसीबीला गरज वाटत नसल्याचे दिसून येते.' नाव बदलणे हा ईसीबीचा अधिकार आहे, हे खरे असले तरी संवेदनशीलता जपणेही महत्त्वाचे आहे. यानंतर एखाद्या भारतीय खेळाडूचे नाव ट्रॉफीला देण्यात येणार असेल तरी त्याने ते नम्रपणे नाकारायला हवे, कारण पतोडी यांच्याबाबत जे घडले ते भविष्यात त्यांच्याबाबतही घडू शकेल, असा इशारादेखील गावसकर यांनी दिला.