Join us  

Suryakumar Yadav, IND vs SL 3rd T20: 'सूर्या'च्या तेजाने होरपळली श्रीलंका, हार्दिकच्या 'यंग ब्रिगेड'ने जिंकली टी२० मालिका

सूर्यकुमारने ठोकलं शतक, अर्शदीपने घेतले ३ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2023 10:22 PM

Open in App

Suryakumar Yadav, IND vs SL 3rd T20: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताच्या 'यंग ब्रिगेड'ने तिसऱ्या आणि अखेरच्या टी२० सामन्यात श्रीलंकेच्या संघाला ९१ धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले आणि मालिका २-१ ने जिंकली. सूर्यकुमार यादवने केलेली ११२ धावांची नाबाद खेळी आणि त्याला भारतीय गोलंदाजांची मिळाली शिस्तबद्ध साथ यांच्या जोरावर टीम इंडियाने श्रीलंकेला पराभूत केले. भारतात श्रीलंकेने आतापर्यंत कधीही टी२० मालिका जिंकलेली नाही, त्यामुळे हार्दिकच्या नव्या दमाच्या संघाने ही परंपरा कायम ठेवत भारताचा विजय निश्चित केला. धुवाँधार फटकेबाजी करणाऱ्या सूर्यकुमार यादवला सामनावीर घोषित करण्यात आले.

--

सामन्यात नाणेफेक जिंकून हार्दिकने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इशान किशन पहिल्याच षटकात बाद झाला. पण त्यानंतर राहुल त्रिपाठीने १६ चेंडूत तुफानी ३५ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने दमदार खेळी केली. शुबमन गिलअर्धशतकाच्या जवळ पोहोचला पण ४४ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या (४) आणि दीपक हु़ड्डा (४) स्वस्तात बाद झाले. हे दोघे गेल्यावर अक्षर पटेलने सूर्यकुमारला चांगली साथ दिली. सूर्यकुमारने तुफान फटकेबाजी करत ४५ चेंडूत शतक ठोकले. हे सूर्याचे तिसरे आणि भारतीय फलंदाजाकडून यंदाच्या वर्षातील पहिले टी२० शतक ठरले. सू्र्याने ७ चौकार आणि ९ षटकारांच्या साथीने नाबाद ११२ धावा चोपल्या. अक्षर पटेलनेही ९ चेंडूत ४ चौकारांसह नाबाद २१ धावा करत संघाला २२८ धावांपर्यंत पोहोचवले.

--

२२९ धावांच्या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरूवात खराब झाली. त्यानंतर त्यांना सावरताच आले नाही. पाथुम निसांका १५ धावांवर बाद झाला. कुसल मेंडिस देखील २३ धावा काढून माघारी परतला. या दोंघाच्या बाद होण्यानंतर श्रीलंकेच्या डावाल गळतीच लागली. अविष्का फर्नांडो १ धाव काढून बाद झाला. धनंजय डिसिल्वाने २२, चरिथ असालांकाने १९, दसुन शनाकाने २३ धावा करत संघर्ष करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. हसरंगा ९ धावांवर , करूणरत्ने शून्यावर, महेश तिक्षणा २ धावांवर तर मदुशंकाने १ धाव काढून बाद झाला. त्यामुळे भारताने ९१ धावांनी सामना जिंकला.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाहार्दिक पांड्यासूर्यकुमार अशोक यादवशुभमन गिल
Open in App