Join us  

"सरावादरम्यान त्याने आधीच..."; सूर्यकुमारच्या अप्रतिम कॅचमागचे प्रशिक्षकांनी सांगितले गणित

Suryakumar Yadav : टी-२० वर्ल्डकपच्या शेवटच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने घेतलेल्या एका झेलने संपूर्ण खेळ बदलला आणि भारतीय संघाला विजय मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 10:43 AM

Open in App

IND vs SA Final:भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ चे विजेतेपद पटकावले. भारताने २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकला होता आणि तेव्हापासून भारतीय संघाला एकही विजेतेपद मिळवता आले नव्हते. मात्र आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १७ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले आहे. संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत सर्वच भारतीय खेळाडूंनी धडाकेबाज कामगिरी केली. शेवटच्या सामन्यातही यात सातत्य राखण्याचा प्रयत्न भारतीय खेळाडूंनी केला. पण या सगळ्यात मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवने शेवटच्या सामन्यावर आपलं वर्चस्व गाजवले. सूर्यकुमारने सामना हातातून निसटत असताना घेतलेला झेल हा कायमच सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे. मात्र या झेलबाबत भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षकांनी महत्त्वाचे विधान केले आहे.

टी-२० विश्वचषक  विजयासाठी दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या षटकात १६ धावांची गरज होती. मात्र हार्दिक पांड्याने केवळ ८ धावा दिल्या आणि भारतीय संघाला विजेतेपद मिळाले. यादरम्यान हार्दिकने षटकाच्या पहिल्याच चेंडूवर डेव्हिड मिलरला आपला बळी बनवले. मात्र, ही विकेट सूर्यकुमार यादवच्या खात्यात जावी, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. कारण सूर्यकुमारने शेवटच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बाऊंड्री लाइनवर अप्रतिम झेल घेत संपूर्ण सामना फिरवला. सूर्यकुमार यादवच्या या महत्त्वाच्या झेलबद्दल बोलताना भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टीके दिलीप यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा लागतो असं म्हटलं आहे.

"सरावादरम्यान त्याने आधीच ५० झेल घेतले असतील. बाऊंड्रीजवळील दोरीची जाणीव असणे आणि बॉल बाहेर फेकून तो पुन्हा पकडू शकतो हा आत्मविश्वास असणे खूप महत्त्वाचे आहे. त्या वेळी निर्णय घेण्याचा तो क्षण होता आणि सूर्यकुमारने घेतला," असे भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टीके दिलीप म्हणाले.

दरम्यान, डेव्हिड मिलरची कॅच घेताना बाऊंड्री लाईनजवळ सूर्याचा तोल गेला होता. पण बाऊंड्री लाईन पाहू त्याने बॉल आत टाकला आणि पुन्हा स्वतः आत येऊन कॅच पूर्ण केला. हा झेल भारतासाठी खूप महत्त्वाचा ठरला.

आयसीसी टी-२० क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या सूर्यकुमार यादवने आठ डावात २८.४२ च्या सरासरीने १९९ धावा केल्या. या कालावधीत त्याचा स्ट्राइक रेट १३५.३७ होता. सूर्याने २०२४ च्या टी20 विश्वचषकात दोन अर्धशतके झळकावली. रोहित शर्मानंतर तो सध्याच्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारतद. आफ्रिकासूर्यकुमार अशोक यादव