Abhushek Sharma Team India Cricketer, Delhi Airport : टीम इंडियाचा स्टार फलंदाज अभिषेक शर्मासोबत दिल्लीविमानतळावर गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीविमानतळावर डावखुऱ्या भारतीय सलामीवीराला वाईट अनुभव आला. त्याने स्वत: सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली. अभिषेक शर्माच्या म्हणण्यानुसार, इंडिगोच्या स्टाफकडून त्याला वाईट वागणूक मिळाली. तेथील कर्मचारी त्याच्याशी नीट वागले नाहीत. त्यातही अभिषेकने एका विशिष्ट व्यक्तीचे नाव घेत निशाणा साधला.
विमानतळावर नेमकं घडलं?
अभिषेक सोशल मीडियावरून सांगितलं की, दिल्ली विमानतळावर इंडिगोच्या फ्लाइटबद्दल मला एक अतिशय वाईट अनुभव आला. त्यांच्या स्टाफने केलेली वर्तणुक मला अजिबात आवडली नाही. स्टाफपैकी काऊंटर मॅनेजर सुश्मिता मित्तल यांचं वागणं तर खूपच वाईट आणि अस्वीकारार्ह होतं. मी वेळेत विमानतळावर पोहोचलो होतो. योग्य काऊंटरवर पण गेलो होतो. मला कारण नसताना उगाच दुसऱ्या काऊंटरवर पाठवलं गेलं. आणि माझा वेळ वाया गेल्यानंतर मला सांगितलं की मला चेक-इन करायला उशीर झाला आहे, त्यामुळे माझी फ्लाइट मिस झाली. मला फक्त एक दिवसाची सुट्टी होती. माझा अख्खा दिवस वाया गेला. त्यातच आणखी वाईट गोष्ट म्हणजे हा प्रकार घडल्यानंतरही त्यांनी मला सहकार्य केलं नाही. विमानतळावरील हा माझा सर्वात वाईट आणि घाणेरडा अनुभव होता. स्टाफचे मॅनेजमेंटदेखील खूपच घाण होतं.
दरम्यान, अभिषेक शर्मा हा गेल्या IPL पासून खूप चर्चेत आहे. ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक या जोडीने IPL 2024 मध्ये अनेक सामन्यात सनरायजर्स हैदराबाद संघाला अतिवेगवान सुरुवात करून दिली होती. हाच वेग अभिषेकने टीम इंडियाकडून खेळतानाही कायम ठेवला होता. तसेच देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्येही त्याने तुफानी खेळी केल्या आहेत. IPL 2025 साठी SRH ने त्याला संघात कायम ठेवलं आहे.