Join us  

IPL 2022: आयपीएल संघांचे सराव १४ मार्चपासून मुंबईत रंगणार

आयसीपीएल २०२२ मध्ये सहभागी असलेले सर्व दहा संघ मुंबईत ८ मार्च रोजी दाखल होणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2022 8:49 AM

Open in App

नवी दिल्ली : आयसीपीएल २०२२ मध्ये सहभागी असलेले सर्व दहा संघ मुंबईत ८ मार्च रोजी दाखल होणार आहेत. सर्व खेळाडूंना तीन-चार दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. त्यानंतर आरटीपीसीआर चाचणी होईल. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ १४ मार्चपासून सरावास प्रारंभ करतील, असे आयपीएल सूत्रांनी सांगितले.

बीसीसीआयने आयपीएल संघांच्या सरावासाठी मुंबईतील पाच स्थानांची निवड केली. त्यात मुंबई क्रिकेट संघटनेचे बांद्रा- कुर्लास्थित स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स,  क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे ब्रेबॉर्न स्टेडियम, डी.वाय. पाटील स्टेडियम, रिलायन्स कॉर्पोरेटचे नवी मुंबईतील मैदान आणि ठाणे येथील एमसीए मैदानाचा समावेश आहे. आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक याच आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.  आयपीएल संचालन परिषदेने २६ मार्च ते २९ मे हा कालावधी मंजूर केला असून ७० सामने महाराष्ट्रात होतील. त्यातील  ५५ सामने मुंबईत आणि १५ सामने पुण्यात खेळले जातील. यंदा १२ डबल हेडर सामने होण्याची शक्यता आहे.  सर्व खेळाडूंना ३-४ दिवस विलगीकरणात रहावे लागणार आहे. मुंबईत येण्याआधी प्रत्येक खेळाडूला आरटी-पीसीआर चाचणी करणे गरजेचे आहे.

आयपीएल सर्वोत्कृष्ट : उस्मान ख्वाजा

पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज उस्मान ख्वाजा याने प्रसारमाध्यमांपुढे आयपीएलचे तोंडभरून कौतुक केले. आयपीएलची तुलना पीएसएल किंवा अन्य कोणत्याही लीगशी करता येणार नाही, असे ख्वाजा म्हणाला. उस्मान मूळचा पाकिस्तानचा आहे.  तो पुढे म्हणाला,‘आयपीएल जगात सर्वोत्कृष्ट आहे यात शंका नाही.  आयपीएल आणि पीएसएल यांची तुलना देखील होऊ शकत नाही.  जेथे जगातील सर्व खेळाडू खेळण्यास उत्सुक असतात अशी आयपीएल एकमेव आहे.’ २०१६ ला पुणे सुपर जायंट्सकडून आयपीएल खेळलेला ख्वाजा बिग बॅश आणि पीएसएलदेखील खेळतो.

टॅग्स :आयपीएल २०२२
Open in App