Join us

U19 World Cup, IND vs AUS: भारताच्या 'यंग ब्रिगेड'ने रचला इतिहास; केला भल्या भल्यांनाही न जमलेला पराक्रम

'अशी' कामगिरी करणार भारत पहिलाच संघ, इतर संघ आसपासही नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 08:32 IST

Open in App

U19 World Cup, IND vs AUS: शतकी खेळी करणारा कर्णधार यश धुल याने शेख रशिदसोबत केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला २९१ धावांचं मोठं आव्हान दिलं होतं. हे आव्हान पेलवताना यजमानांची दमछाक झाली. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाचा संघ ९६ धावांनी पराभूत झाला. या विजयासाह भारतीय संघाने १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत पोहोचताच भारतीय संघाने एक मोठा पराक्रम केला.

u19 World Cup मध्ये भारतीय संघ हा सलग चौथ्यांदा तर एकूण आठव्यांदा फायनल गाठण्यात यशस्वी ठरला. भारतीय संघाने या दमदार कामगिरीसह इतिहास रचला. भारतीय संघाने २०१६, २०१८, २०२० आणि २०२२ अशा सलग चार विश्वचषक स्पर्धांमध्ये फायनलमध्ये धडक मारली. सलग चार वेळा फायनल गाठणारा भारत हा एकमेव संघ आहे. याशिवाय आतापर्यंत इतर काही संघांना जास्तीत जास्त सलग दोन वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पण भारताच्या यंग ब्रिगेडने मात्र इतिहास रचला.

अशी रंगली सेमीफायनल

प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत ५ बाद २९० धावा कुटल्या. भारताची सुरूवात संथ झाली. पण नंतर कर्णधार यश धुल मैदानात उतरला. त्याने शेख रशिदसह सामन्याचा ताबाच घेतला. या दोघांनी द्विशतकी भागीदारी केली. यश धुलने चेंडूंत १० चौकार आणि १ षटकारासह ११० धावा केल्या. तर रशिदचे शतक अवघ्या ६ धावांनी हुकले. तो ८ चौकार व १ षटकारासह ९४ धावांवर बाद झाला. अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे २९० पर्यंत मजल मारली.

२९१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ ४१.५ षटकांत १९४ धावा काढून गारद झाला. ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर टी विली ३ धावांवर बाद झाला. त्यानंतर कॅम्पबेल आणि मिलर जोडीने ६८ धावांची भागीदारी केली. अंगक्रिशने ही जोडी फोडली. त्यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाजी ढेपाळली. लेचनन शॉ एकाकी झुंज देत ५१ धावा केल्या. पण भारतीय माऱ्यापुढे त्यालाही फार काही करता आलं नाही. भारताकडून विकी ओस्तवालने ३, निशांत सिंधू आणि रवी कुमारने प्रत्येकी २ तर कौशल तांबे व अंगक्रिश रघुवंशीने प्रत्येकी एक गडी तंबूत पाठवला.

आता ५ फेब्रुवारीला भारतीय संघ फायनलमध्ये इंग्लंडशी भिडणार आहे.

टॅग्स :19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक फायनलभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया
Open in App