Join us  

Virat Kohli 100th Test, IND vs SL Test Series : विराटची १००वी कसोटी प्रेक्षकांविना खेळवण्याच्या BCCI च्या निर्णयावर Sunil Gavaskar म्हणतात...

४ ते ८ मार्च दरम्यान रोहितच्या नेतृत्वाखाली विराट खेळणार १००वी कसोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 10:37 PM

Open in App

Virat Kohli 100th Test vs BCCI, Sunil Gavaskar : भारतीय संघाने श्रीलंकेविरूद्ध टी२० मालिका ३-०ने जिंकली. त्यानंतर आता दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला ४ मार्चपासून सुरूवात होणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे विराट कोहलीचा हा १००वा कसोटी सामना असणार आहे. पण या सामन्यात विराटच्या नावाचा जयघोष करण्यासाठी प्रेक्षक नसणार आहेत. कोरोनाच्या नियमांमुळे प्रेक्षकांविना हा सामना खेळवण्यात येणार आहे. इतर सामन्यांसाठी प्रेक्षकांना परवानगी असताना हाच सामना अशा प्रकारचा खेळवण्यामागे BCCIचं गलिच्छ राजकारण जबाबदार असल्याचं मत अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर मांडल्याचं दिसलं. आता, BCCI च्या या निर्णयावर माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

"तुम्ही कोणताही सामना खेळत असताना प्रेक्षक असावे अशीच प्रत्येकाची इच्छा असते. भारतीय संघाने गेल्या दोन वर्षात अनेक सामने प्रेक्षकांविना खेळले आहेत. क्रिकेटर असो किंवा अभिनेता असो, प्रेक्षकांच्या समोर आपली कला सादर व्हावी अशीच त्याची इच्छा असते. १००वी कसोटी निश्चितच खूप मौल्यवान असते. त्यामुळे या सामन्यासाठी असा निर्णय घेतल्याचं मला व्यक्तिश: दु:ख होतंय. पण मला असं वाटतं की हा निर्णय जनहिताच्या दृष्टीने घेतला आहे. मोहालीच्या आसपासच्या परिसरात काही दिवसांपासून कोविडच्या केसेस वाढल्याचं समजतंय. त्यामुळे जनतेचं हित पाहूनच हा निर्णय झाला असावा", असं मत गावसकरांनी व्यक्त केलं.

विराटची १००वी कसोटी: पंजाब क्रिकेट बोर्ड म्हणतं...

"कसोटी सामन्यासाठी जे लोक स्टेडियममध्ये ऑन ड्युटी असतील, त्यांना वगळता इतर कोणालाही स्टेडियमच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही. BCCI ने ठरवून दिलेल्या कोविडच्या नियमांनुसारच हा निर्णय घेण्यात आला आहे. मोहाली आणि आसपासच्या भागात कोविडच्या काही केसेस आढळल्या आहेत. त्यामुळे सावधगिरी बाळगत हा निर्णय घेण्यात आला आहे. विराटसाठी हा मोठा सामना असल्याने संपूर्ण स्टेडियममध्ये विराटचे मोठे बॅनर्स लावून सजावट केली जाईल", असं स्पष्टीकरण पंजाब बोर्डाचे खजिनदार आरपी सिंगला यांनी दिली.

विराटबद्दलचं गलिच्छ राजकारण थांबवा; चाहत्यांचा संताप

पंजाबच्या धर्मशालामध्ये झालेल्या दोन टी२० सामन्यात प्रेक्षक मोठ्या संख्येने हजर होते. बंगळुरूत होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठीही प्रेक्षकांच्या हजेरीला परवानगी देण्यात आली आहे. पण विराटच्या १००व्या सामन्याच्या कसोटीसाठी मात्र प्रेक्षकांविना सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे चाहत्यांना मात्र यात बीसीसीआयचं गलिच्छ राजकारण दिसत असून हे राजकारण थांबवा असा संताप सोशल मीडियावरून व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाविराट कोहलीसुनील गावसकरबीसीसीआय
Open in App