Join us  

Big News: विराट कोहली ५ वर्षात एकही मोठी स्पर्धा जिंकू शकला नाही, आता कर्णधारपद जाणार?

T20 World Cup 2021: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा सलग दुसऱ्या सामन्यात मानहानीकारक पराभव झाला. पाकिस्ताननं भारताला १० विकेट्सनं पराभूत केलं तर न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघानं अक्षरश: लोटांगण घातलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2021 5:43 PM

Open in App

T20 World Cup 2021: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा सलग दुसऱ्या सामन्यात मानहानीकारक पराभव झाला. पाकिस्ताननं भारताला १० विकेट्सनं पराभूत केलं तर न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघानं अक्षरश: लोटांगण घातलं. भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीचा फटका संघाचा कर्णधार विराट कोहली याला बसण्याची शक्यता आता वर्तविण्यात येत आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वावर याआधीही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होतं. आता वर्ल्डकप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर कोहलीला कर्णधारपदावर पाणी सोडावं लागणार असल्याचं बोललं जात आहे. 

गेल्या दोन सामन्यांमधील भारतीय संघाच्या पराभवावर सध्या जोरदार टीका केली जात आहे. यात संघाचा कर्णधार या जबाबदारीनं कोहली सर्वाधिक टीकेचा धनी झाला आहे. संघाच्या एकंदर खेळावरच माजी क्रिकेटपटूंनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. "भारतीय संघाच्या पराभवानं नव्हे, तर ज्यापद्धतीनं संघ पराभूत झाला ते पाहून मी हैराण झालो. तुमच्याकडे खूप सारे लोक असतात. सपोर्ट स्टाफ असतो पण मैदानात खेळायला तर शेवटी ११ जणांनाच लागतं. क्रिकेटपटूच मैदानात जाऊन खेळतात", असं माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाला. 

ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या आधीच कोहलीनं वर्ल्डकप स्पर्धेनंतर भारतीय ट्वेन्टी-२० संघाचं नेतृत्त्व करणार नसल्याचं जाहीर केलं आहे. पण आता संघाची कामगिरी पाहता कोहलीला वनडे आणि कसोटीच्या कर्णधारपदावरुनही पायऊतार व्हावं लागू शकतं असं म्हटलं जात आहे. कारण कर्णधार म्हणून कोहलीला गेल्या पाच वर्षात एकही मोठी स्पर्धा जिंकता आलेली नाही. कोहली आयसीसीच्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसोबतच एकदिवसीय वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतही अपयशी ठरला आहे. त्यामुळे येत्या काळात कोहलीला कर्णधारपदावरुन पायऊतार व्हावं लागू शकतं. 

द्विपक्षीय सीरिजमध्ये कोहलीनं भारतीय संघाला यश प्राप्त करुन दिलेलं असलं तरी यात तुमचा प्रतिस्पर्धी एकच संघ असतो. यात तुम्ही केलेल्या चुका टाळता येण्याची संधी असते. सलग पाच सामन्यांमध्ये तुमच्यासमोर जर एकच संघ असेल तर तुम्हाला योजना आखण्याचीही जास्त संधी मिळते. अशावेळी संघाचं नेतृत्त्व करणं अधिक सोपं असतं. पण आयसीसी स्पर्धांमध्ये तुम्हाला विविध संघांचं आव्हान पेलावं लागतं. यात तुम्हाला संघाचा कर्णधार म्हणून सातत्यानं रणनितीत बदल आणि अचूक निर्णय घ्यावे लागतात. अशा परिस्थितीत कोहली स्वत:वरचं नियंत्रण गमावून बसतो अशी टीका त्याच्यावर केली जात आहे. 

टॅग्स :विराट कोहलीआयसीसीट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१बीसीसीआय
Open in App