Join us  

आजचं 'विराट' शतक पत्नी अनुष्का अन् मुलगी वामिकासाठी- 'किंग कोहली'ने व्यक्त केल्या भावना

डाव संपल्यानंतर विराटने मुलाखतीत आपल्या भावनांना वाट करून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2022 9:31 PM

Open in App

Virat Kohli Anushka Sharma, Asia Cup 2022 IND vs AFG: अफगाणिस्तान विरूद्ध केवळ औपचारिकता म्हणून खेळण्यात आलेल्या सामन्यात भारतीय चाहत्यांना अचानक नवसंजीवनी मिळाली. भारतीय संघ जरी आशिया चषकातून बाहेर फेकला गेला असला तरी, गेली अडीच-तीन वर्षे भारतीय चाहते ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, ती गोष्ट आज अखेर घडली. विराट कोहलीने तब्बल १ हजार २१ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर ७१वे आंतरराष्ट्रीय शतक लगावले. विराट कोहलीने तुफान फटकेबाजी करत टी२० क्रिकेटमधील आपले पहिलेवहिले शतक ठोकले. विराटने केलेल्या ६१ चेंडूत नाबाद १२२ धावा आणि रोहितच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलने केलेल्या ४२ चेंडूत ६१ धावांच्या जोरावर भारताने २० षटकात २१२ धावांची मजल मारली. या डावानंतर विराटने आपल्या मनातील भावनांना वाट करून दिली.

"गेल्या तीन वर्षांपासून मी शतकाच्या प्रतिक्षेत आहे. आज मी ठोकलेलं शतक सेलिब्रेशन करण्याजोगं आहे की नाही, याबद्दल मी आताच काही बोलणार नाही. पण आजचं शतक हे माझ्यासाठी खूपच खास आहे. गेल्या अडीच-तीन वर्षांनी मला खूप काही शिकवलं. नशीबाची साथ आणि भूमिका किती महत्वाची असते, याची मला पूरेपुर प्रचिती आली. त्यामुळेच आजचं हे शतक मी माझी पत्नी अनुष्का आणि माझी मुलगी वामिका हिला समर्पित करतो. अनुष्का माझ्या कठीण काळात माझ्या पाठिशी उभी राहिली होती. मी आज जो काही कणखरपणे उभा आहे त्याला अनुष्काचेच पाठबळ आहे. अनुष्कामुळे मी सकारात्मकतेने खेळत राहिलो आणि आज त्याचं मला फळ मिळालं, अशा शब्दांत विराटने आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याने विश्रांती घेतल्याने, कर्णधार लोकेश राहुल (KL Rahul) आणि विराट कोहली यांनी सलामीला उतरण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाचा हा निर्णय एकदम 'हिट' ठरला. रोहितच्या अनुपस्थितीत विराट-राहुल जोडीने शतकी सलामी देत आपापली अर्धशतके पूर्ण केली. विराट कोहलीने आशिया चषकाच्या यंदाच्या हंगामात हाँगकाँग आणि पाकिस्ताननंतर आज तिसरे अर्धशतक ठोकले. तर फॉर्मसाठी झगडणाऱ्या लोकेश राहुलला देखील सूर गवसला. विराटच्या साथीने त्याने दमदार अर्धशतक ठोकत संघाला रोहितची उणीव अजिबात भासू दिली नाही. राहुल ४२ चेंडूत ६१ धावांवर बाद झाला. त्याने ६ चौकार आणि २ षटकार लगावले. सूर्यकुमार यादव (६) स्वस्तात बाद झाला. पण विराटने मात्र २० षटके पूर्ण खेळून काढली. त्याने ६१ चेंडूत १२ चौकार आणि ६ षटकार लगावत नाबाद १२२ धावा कुटल्या. रिषभ पंतनेही (नाबाद २०) विराटला शेवटपर्यंत साथ दिली.

टॅग्स :एशिया कप 2022विराट कोहलीअनुष्का शर्माभारतीय क्रिकेट संघ
Open in App