Virat Kohli Returns to Ranji Trophy, Delhi vs Railways : टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी १३ वर्षांनी मैदानात उतरला. कोहलीचा आज सुरु झालेल्या रेल्वे विरूद्धच्या सामन्यासाठी दिल्लीच्या संघात समावेश करण्यात आला. रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या टप्प्यातील दिल्लीचा शेवटचा साखळी सामना आजपासून सुरु झाला. त्यात विराट मैदानावर उतरला. विराटने या सामन्यासाठी जय्यत तयारी केली. तसेच, धावांचा दुष्काळ संपवण्यासाठी त्याने '५५ मिनिट्स प्लॅन' तयार करत सराव केला. विराटला मैदानात खेळताना पाहून सारेच आनंदी झाले, पण एका खेळाडूला मात्र थोडेसे दु:ख झाले असू शकते. तो खेळाडू म्हणजे संघातून वगळला गेलेला जॉन्टी सिधू.
कर्णधार आयुष बडोनीच्या नेतृत्वाखालील संघात विराटला संघात घेण्यासाठी जॉन्टी सिद्धूला संघातून वगळावे लागले. सहाव्या फेरीत सौराष्ट्र विरुद्धच्या सामन्यात सिधू दिल्ली संघाचा भाग होता, मात्र तो या सामन्यात खेळत नाहीये. सिधूने आतापर्यंत २६ प्रथम श्रेणी सामने खेळले असून त्यात ४३ च्या सरासरीने १४३५ धावा केल्या आहेत. पण सिधूला संघातून बाहेर करण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्याची ताजी कामगिरी. गेल्या ३ सामन्यांमध्ये त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. सौराष्ट्र विरुद्धच्या गेल्या सामन्यात त्याने १६ आणि ४ धावांची खेळी केली. याआधी त्याला आसामविरुद्ध केवळ १३ धावा तर तामिळनाडूविरुद्ध केवळ ४ आणि २३ धावांची खेळी करता आली. अशा परिस्थितीत दिल्ली संघाला जॉन्टी सिधूच्या बदल्यात विराट कोहलीच्या रूपाने संघात दिलासादायक बदल करावा लागला, असेच म्हणता येईल.
दिल्ली संघात चार बदल
अरुण जेटली स्टेडियमवर सुरु असलेल्या रेल्वे विरुद्धच्या सामन्यासाठी दिल्ली संघात चार बदल करण्यात आले. मागील सामन्यात खेळणाऱ्या २ गोलंदाजांना आणि २ फलंदाजांना संघातून वगळण्यात आले. गोलंदाजीत हर्ष त्यागी आणि मयंक गोसाई यांच्या जागी सिद्धांत आणि मनी ग्रेवालला संधी देण्यात आली. जॉन्टी सिधूच्या जागी विराटला संधी मिळाली. तर ऋषभ पंतला संघाबाहेर ठेवून प्रणव राजवंशीला संघात स्थान देण्यात आले.
दिल्लीसाठी सिधूची कामगिरी
- २०१८ मध्ये पदार्पण
- २६ प्रथम श्रेणी सामने
- ४० डावात १४३५ धावा
- ४३.४८ची सरासरी
- ३ शतके आणि ८ अर्धशतके