Join us  

Shoaib Akhtar on Virat Kohli: विराटने T20 World Cup 2022 नंतर 'या' गोष्टीचा नक्कीच विचार केला पाहिजे; Pakistan च्या शोएब अख्तरने दिला सल्ला

शोएब अख्तरने विराटला दिलेला सल्ला तुम्हाला पटतोय का पाहा..

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2022 5:36 PM

Open in App

Shoaib Akhtar on Virat Kohli, Asia Cup 2022 IND vs AFG: भारतीय चाहते ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, ती गोष्ट अखेर गुरूवारी घडली. विराट कोहलीने तब्बल १ हजार २१ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर शतक लगावले. विराट कोहलीने तुफान फटकेबाजी करत टी२० क्रिकेटमधील आपले पहिलेवहिले शतक ठोकले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचे हे ७१वे शतक ठरले. विराटने ६१ चेंडूत नाबाद १२२ धावा कुटल्या. त्यात १२ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. विराटच्या या वादळी खेळीचे चहुबाजूंनी कौतुक केले जात आहे. पाकिस्तानच्या शोएब अख्तरनेही विराटला शतकासाठी अभिनंदन केलं. त्यासोबतच त्याने, विराट कोहलीला एक विशेष सल्ला दिला.

"भारतीय संघाचा अफगाणिस्तान विरूद्धचा सामना ही केवळ औपचारिकता होती, कारण पाकिस्तान आणि श्रीलंका हे दोन संघ आधीच स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचले होते. भारतीय खेळाडूंना या गोष्टीची कल्पना होती, तरीही विराट कोहलीसारख्या खेळाडूने या सामन्याकडे सकारात्मकतेने पाहिले. लोक पाकिस्तान किंवा श्रीलंका यांना चिअर करत राहणार हे माहिती असतानाही, विराटने मात्र जे आवश्यक होतं ते केलं. विराट फॉर्मशी झुंजत होता, पण अखेर त्याला तब्बल अडीच-तीन वर्षांनी शतक झळकावता आलं. त्यासाठी विराटचं अभिनंदन! पण हे इथेच संपत नाही...", असं शोएब अख्तर म्हणाला.

याचाच संदर्भ देत तो पुढे म्हणाला, "विराट ज्या प्रतीचा खेळाडू आहे त्यानुसार त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक ठोकले पाहिजे. ७१वे शतक नक्कीच खास आहे. त्यासाठी विराटचे, त्याच्या पत्नीचे, मुलीचे, आईचे आणि इतर कुटुंबीयांचे मन:पूर्वक अभिनंदन. त्याने असा खेळ पुढे सुरू ठेवावा. पण टी२० क्रिकेट जर त्याला दडपणाचे वाटत असेल, तर टी२० विश्वचषक स्पर्धेनंतर विराटने त्याबद्दल विचार करावा. टी२० क्रिकेट खेळत राहायचे की इतर दोन फॉरमॅटवर लक्ष केंद्रित करायचे, याचा विराटने नक्कीच टी२० वर्ल्डकपनंतर विचार केला पाहिजे."

दरम्यान, विराटने कालच्या शतकाच्या जोरावर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला. विराट कोहलीने टी२० मध्ये आपली छाप सोडलीच, पण त्यासोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व फॉरमॅटमध्ये मिळून त्याने २४ हजार धावांचा टप्पा ओलांडला. असा पराक्रम करत त्याने सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्या पंक्तीत बसण्याचा मान मिळवला. त्यातही विराटने ५२२ आंतरराष्ट्रीय डावांमध्ये २४ हजार धावांचा टप्पा ओलांडला. सचिनला हा टप्पा ओलांडण्यासाठी ५४० डाव खेळावे लागले होते.

टॅग्स :एशिया कप 2022विराट कोहलीशोएब अख्तरट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१
Open in App