Join us  

IND vs PAK Asia Cup 2022: भारत - पाकिस्तान सामन्याआधी बाबर आझमचं Virat Kohli बद्दल मोठं विधान, म्हणाला...

कोहली बद्दलचे असे विधान भारत-पाक सामन्याला कलाटणी देण्यास ठरू शकतं कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 3:16 PM

Open in App

Virat Kohli IND vs PAK: भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याच्यासाठी गेली अडीच-तीन वर्षे फारशी चांगली गेलेली नाहीत. २०१९ नंतर विराट कोहलीने अद्याप एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावलेलं नाही. IPL च्या गेल्या दोन हंगामात देखील विराटला सूर गवसला नाही. दोन-तीन सामन्यांत अर्धशतक झळकावण्या व्यतिरिक्त त्याला फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. विराटच्या या सततच्या खराब फॉर्ममुळे त्याला अनेक मालिकांमधून विश्रांती देण्यात आली होती. अखेर आज विराट पाकिस्तान (India vs Pakistan) विरूद्ध आशिया चषकाच्या (Asia Cup 2022) सामन्यात खेळायला उतरणार आहे. या सामन्याआधी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने विराटबद्दल एक मोठं वक्तव्य केले.

भारत आणि पाकिस्तान ICC च्या स्पर्धांमध्ये जेव्हा जेव्हा आमनेसामने आले, तेव्हा भारताचे पारडे जड होते. पण गेल्या वर्षी भारताला पाकिस्तानने १० गडी राखून अतिशय सहज हरवले. त्यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहली होता, तर पाकिस्तानच्या संघाचा कर्णधार बाबर आझम होता. आता त्यानंतर आज भारत-पाक सामना होणार असतानाच बाबरने विराटबद्दल मोठं विधान केले. "आयुष्यात काहीच सोपं नसतं. सतत काही ना काही आव्हाने समोर उभी असतात. त्या आव्हानांकडे तुम्ही कशा दृष्टीकोनातून बघता ते तुमच्या विचारशक्तीवर अवलंबून असतं. तसेच, वाईट काळ आला तर त्या काळातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही कसा प्रयत्न करता तेदेखील तुमच्यावरच अवलंबून असते. सध्या विराट वाईट फॉर्ममध्ये आहे, पण तरीही तो विश्व क्रिकेटमधील आजही सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे", असे मोठे आणि महत्त्वाचे वक्तव्य बाबर आझमने केले.

"विराट सारख्या प्रतिभावान खेळाडूच्या विरोधात जेव्हा खेळण्यासाठी मैदानात उतरायचे असते त्यावेळी अशा खेळाडूसमोर तुम्ही नक्की कशा विचारांनी उतरणार आहेत त्यावर खूप काही अवलंबून असते. असे बडे खेळाडू आणि त्यातही त्यांच्यासमोर वेगवेगळ्या मैदानांवर व वातावरणात क्रिकेट खेळायचे असते, त्यामुळे अशा वेळी स्वत:च्या विचारांवर लक्ष केंद्रित करणे खूप महत्त्वाचे असते. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत प्रत्येक खेळाडू चढ-उतार पाहतो. कोणाचीही क्रिकेट कारकीर्द एकसारखी नसते. कोणत्याही क्रिकेटपटूच्या आयुष्यात केवळ यश असते असे होत नाही. कधी ना कधी त्यालाही अपयशाचा सामना करावाच लागतो. आयुष्यात आणि क्रिकेट कारकिर्दीत अनेकदा असेही घडू शकते की परिस्थिती तुमची परीक्षा घेत असते. त्यावेळी तुम्ही मानसिकदृष्ट्या अतिशय शांत आणि बलवान असणे महत्त्वाचे आहे", असेही बाबर आझमने विराटबद्दल बोलताना सांगितले. कोहली बद्दलचे असे विधान भारत-पाक सामन्याला कलाटणी देण्यास कारणीभूत ठरू शकते. कारण दिलासा देणारे शब्द कानावर पडल्याने दोन्ही संघांमधील स्पर्धा 'काँँटे की टक्कर' असली तरी निकोप व खेळीमेळीच्या वातावरणात होऊ शकते.

भारताचा चमू: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, आर अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान

पाकिस्तानचा चमू: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हॅरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, शाहनवाज दहनी, उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन, हसन अली.

टॅग्स :एशिया कप 2022भारत विरुद्ध पाकिस्तानविराट कोहलीबाबर आजम
Open in App