Allan Border on Virat Kohli Wicket, IND vs AUS 3rd Test : ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाने ५१ धावांच्या मोबदल्यात ४ बळी गमावले. ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात ट्रेव्हिस हेड (१५२), स्टीव्ह स्मिथ (१०१) यांची शतके आणि अलेक्स कॅरीच्या (७०) अर्धशतकाच्या बळावर ४४५ धावा केल्या. बुमराह वगळता कोणत्याही गोलंदाजाला छाप पाडता आली नाही. गोलंदाजांपाठोपाठ भारतीय फलंदाजांनीही साऱ्यांची निराशा केली. संघाची पन्नाशी होण्याआधीच यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली आणि रिषभ पंत तंबूत परतले. जगातील महान फलंदाजांपैकी एक मानल्या जाणाऱ्या विराट कोहलीने पुन्हा एकदा निराश केले. ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडूला बॅटची एज लावून तो झेलबाद झाला. त्याच्या या चुकीवर आता ऑस्ट्रेलियन दिग्गज अलन बॉर्डर यांनी रोखठोक मत मांडले आहे.
विराट जेव्हा मैदानात आला तेव्हा संघाची धावसंख्या २ बाद ६ धावा अशी होती. अशा परिस्थितीत अतिशय संयमाने फलंदाजी करणे अपेक्षित होते. पण ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचलेल्या सापळ्यात विराट हमखास अडकला. १६ चेंडूंचा सामना करणारा विराट अवघ्या ३ धावांवर झेलबाद झाला. त्याच्या बाद होण्याच्या पद्धतीवरून तो टीकेचा धनी ठरत आहे. अलन बॉर्डर यांनीही यावर मत व्यक्त केले आहे. "आज विराट ज्या चेंडूवर बाद झाला, तो चेंडू सहसा एखाद्या फलंदाजाने सोडून द्यायला हवा असतो. विराट जर चांगल्या फॉर्ममध्ये असता तर कदाचित त्याने तो चेंडू नक्कीच सोडून दिला असता. मला असा प्रश्नच पडलाय की विराटचं नक्की काय चाललंय? तो नेमका कुठल्या विचारांमध्ये हरवलाय? कारण तो फलंदाजी करताना नेहमीच्या सहजतेने खेळताना दिसत नाही."
सुनील गावसकर यांनीही विराटला सुनावलं...
विराट कोहलीच्या बाद होण्याबाबत बोलताना गावसकर म्हणाले, "तो चेंडू जर चौथ्या स्टंपवर असता तर मी समजू शकलो असतो. पण तो चेंडू वाईड होता, सातव्या-आठव्या स्टंपवर होता. त्या चेंडूला बॅट लावण्याची काहीच गरज नव्हती. बाद झाल्यानंतर विराट नक्कीच नाराज झाला असणार. विराट कोहली बाद झाल्यावर रिषभ पंत मैदानात येण्याआधी पावसाला थोडी सुरुवात झाली होती. जर विराटने थोडासा संयम दाखवला असता तर आज दिवसाचा खेळ संपताना विराट आणि केएल राहुल दोघेही नाबाद राहून पॅव्हेलियनमध्ये परतले असते. शुबमन गिल आणि विराट कोहली दोघांनीही ऑफसाईडच्या बाहेरचे चेंडू मारले आणि झेल देऊन बाद झाले. हे फटके अनावश्यक होते. त्यांच्या बाद होण्याचं खेळपट्टीशी काहीही कनेक्शन नाही. ते लोक घाण शॉट्स खेळून बाद झालेत."
यशस्वी जैस्वालवरही साधला निशाणा
"यशस्वी जैस्वाल कसा बाद झाला ते तुम्ही पाहा. जेव्हा तुमच्या पुढ्यात इतके मोठे आव्हान असते त्यावेळी तुम्हाला मैदानावर जाऊन थोडे संयमाने खेळणे आवश्यक असते. हवेत शॉट खेळायचा नाही हे आपल्या मनाला कायम सांगावे लागते. ४४५ धावा अर्ध्या तासात होत नाहीत किंवा फॉलो-ऑन टाळायला आवश्यक असणाऱ्या २४५ धावाही अर्ध्या तासात करता येत नाहीत," अशा रोखठोक शब्दांत सुनील गावसकरांनी टीका केली.