Join us  

क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम

New rules of Cricket: 'बीसीसीआय'ने या संदर्भात प्रसिद्धीपत्रक काढून राज्य क्रिकेट संघटनांना दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 7:50 PM

Open in App

New rules of Cricket: क्रिकेट हा अनिश्चिततांचा खेळ मानला जातो. क्रिकेटमध्ये कुठल्याही वेळी काहीही घडू शकते. पण खेळात रंगत टिकून राहते ती खेळाच्या नियमांमुळे. नियम असल्यानेच या खेळाला 'जेंटलमन्स गेम' म्हणतात. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ११ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीपूर्वी क्रिकेटच्या काही नियमांमध्ये बदल केले. भारतातील देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम शुक्रवारी रणजी ट्रॉफीच्या पहिल्या फेरीसह सुरू होत आहे. याचदरम्यान बीसीसीआयकडून काही महत्त्वाचे नियम बदलण्यात आले आहेत. गुरुवारी संध्याकाळी बीसीसीआयने राज्य संघांना याबाबतचे एक प्रसिद्धीपत्रक पाठवले. त्यामध्ये बदललेल्या नियमांची माहिती देण्यात आली. नव्या पत्रकानुसार, काय बदल झाले जाणून घेऊया.

क्रिकेटचे नियम बदलले!

दुखापत, आजार किंवा अपरिहार्य कारणाव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणास्तव फलंदाज मैदान सोडून गेला ( हर्ट रिटायर्ड), तर त्या फलंदाजाला त्वरित बाद ठरवण्यात येईल. विरोधी कर्णधाराच्या संमतीने देखील त्या फलंदाजीला मैदानात फलंदाजीला परतण्याचा पर्याय नसेल. तसेच गोलंदाजीमध्ये जर एखाद्या संघाने चेंडूवर लाळ लावली असेल, तर दंड ठोठावला जाईल. तसेच तो चेंडूही त्वरित बदलावा लागेल.

धावून रन घेताना जर दोनही फलंदाज क्रीजमध्ये पोहोचले असतील आणि त्यानंतर ओव्हरथ्रोचा चौकार गेला तर केवळ ४ धावाच दिल्या जातील. आणखी एक बदल हा सीके नायडू स्पर्धेतील गुण वाटपाशी संबंधित आहे. नवीन नियमांमध्ये दोन परिस्थितींचा उल्लेख करण्यात आला आहे. जर एखाद्या संघाने पहिल्या डावात ९८ षटकांत ३९८ धावा केल्या असतील आणि क्षेत्ररक्षण करताना त्याच संघाला ५ पेनल्टी धावा मिळाल्या असतील तर त्यांची धावसंख्या ४०३ मानून त्यांना ५ फलंदाजी गुण दिले जातील. पण हाच प्रकार जर १०० षटकांनंतर घडला तर मात्र त्यांना ४ गुणच दिले जातील.

 

टॅग्स :ऑफ द फिल्डबीसीसीआयरणजी करंडक