Join us  

दिनेश कार्तिकच्या आधी अक्षर पटेल का? पंतच्या नेतृत्वावर सवाल, आता टीम इंडियाकडून आलं असं उत्तर

India Vs South Africa: कटकमध्ये भारतीय संघ अडचणीत असताना फलंदाजी क्रमात बदल केल्याने पंतच्या रणनीतीवर सवाल उपस्थित केले जात आहेत. त्याला आता टीम इंडियाकडून उत्तर देण्यात आलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 2:36 PM

Open in App

कटक - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीपाठोपाठ कटकमध्येही भारतीय संघाला पराभव पत्करावा लागल्यामुळे रिषभ पंतच्या नेतृत्वावर सवाल उपस्थित होऊ लागले आहे. त्यात  कटकमध्ये भारतीय संघ अडचणीत असताना फलंदाजी क्रमात बदल केल्याने पंतच्या रणनीतीवर सवाल उपस्थित केले जात आहेत. त्याला आता टीम इंडियाकडून उत्तर देण्यात आलं आहे.

कटकमध्ये भारतीय संघाची फलंदाजी सुरू असताना काही फलंदाज झटपट बाद होत गेले. तेव्हा दिनेश कार्तिक ऐवजी अक्षर पटेलला फलंदाजीसाठी पुढे पाठवण्याचा निर्णय संघाने घेतला. या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. कारण त्यावेळी भारतीय संघाची धावसंख्या कमी होती. तसेच आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला दिनेश कार्तिक फलंदाजीला येईल अशी अपेक्षा होती. त्यामुळे त्याला अक्षर पटेलनंतर का फलंदाजीस पाठवण्यात आलं, असा सवाल उपस्थित होत आहे.

या सामन्यात अक्षर पटेल ११ चेंडूत १० धावा काढून बाद झाला. तर दिनेश कार्तिकने आक्रमक फलंदाजी करत २१ चेंडूत ३० धावांची खेळी केली. त्यात दोन चौकार आणा दोन षटकारांचा समावेश होता. 

सामन्यानंतर रिषभ पंतच्या या निर्णयाबाबत सवाल उपस्थित करण्यात आले. तेव्हा टीम इंडियाकडून त्याला उत्तर देण्यात आलं. सामन्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना श्रेयस अय्यरने सांगितले की, याबाबत आम्ही आधीच योजना आखली होती. जेव्हा अक्षर पटेल फलंदाजीसाठी आला तेव्हा सात षटके शिल्लक होती. अशा परिस्थितीत अक्षर पटेल हा असा फलंदाज आहे जो सातत्याने स्ट्राईक रोटेट करून धावफलक हालता ठेवू शकतो. 

त्यावेळी तुम्ही खेळपट्टीवर जाऊन पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी करू शकला नसता. दिनेश कार्तिक असं करण्यात सक्षम आहे. मात्र तो १५व्या षटकानंतर संघासाठी आवश्यक ठरतो. तिथे त्याला फटकेबाजीची संधी मिळते. मात्र ही खेळपट्टी थोडी अवघड होती. त्यामुळे दिनेश कार्तिकलाही सुरुवातीला काही अडचणींचा सामना करावा लागला, असं श्रेयस अय्यरने सांगितलं.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टी-सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना १४८ धावा जमवल्या होत्या. मात्र क्लासेनच्या तुफानी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने चार विकेट्स राखत हा सामना जिंकला.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकादिनेश कार्तिकअक्षर पटेल
Open in App