Join us  

मला एक गोष्ट समजली नाही! भारताच्या पराभवानंतर Sachin Tendulkarकडून सर्वांच्या 'मन की बात'

WTC Final India vs Australia : भारतीय संघाचा आयसीसी स्पर्धा जिंकण्याचा दुष्काळ १० वर्ष झाली तरी कायम आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 8:52 PM

Open in App

WTC Final India vs Australia : भारतीय संघाचा आयसीसी स्पर्धा जिंकण्याचा दुष्काळ १० वर्ष झाली तरी कायम आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने एकहाती वर्चस्व गाजवताना भारतावर २०९ धावांनी विजय मिळवला. वन डे वर्ल्ड कप, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयसीसी कसोटी अजिंक्यपद अशा चारही स्पर्धा जिंकणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला संघ ठरला. टीम इंडियाच्या पराभवानंतर अनेक दिग्गजांनी बरेच प्रश्न उपस्थित केले आहे. सचिन तेंडुलकर यानेही ( Sachin Tendulkar) टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनवरच प्रश्न उपस्थित केला आहे. 

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावातील ४६९ धावांच्या प्रत्युत्तरात भारताला २९६ धावाच करता आल्या. दुसऱ्या डावात  ८ बाद २७० धावांवर डाव घोषित करून भारतासमोर ४४४ धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना आघाडीचे तिन्ही फलंदाज पुन्हा ढेपाळले. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी संघर्ष केला. स्कॉट बोलंडने टाकलेल्या ४७व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर घात झाला. विराट ७८ चेंडूंत ७ चौकारांसह ४९ धावांवर बाद झाला अन् अजिंक्यसह त्याची ८६ धावांची भागीदारी संपुष्टात आली. रवींद्र जडेजाही ( ०) भोपळ्यावर बाद झाला. मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर अजिंक्य ७ चौकारांच्या मदतीने ४६ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर नॅथन लिएनने फास आवळला. भारताचा संघ २३४ धावांत तंबूत परतला.  

सचिन तेंडुलकर म्हणतो...ऑस्ट्रेलियन संघाचे अभिनंदन... त्यांनी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकली. स्टीव्ह स्मिथ व ट्रॅव्हिस हेड यांनी पहिल्या दिवशी मजबूत पाया रचून सामना त्यांच्या बाजूने झुकवला. सामन्यात राहण्यासाठी भारतीय संघाने पहिल्या डावात प्रयत्न केला, परंतु त्यांना यश नाही आलं. भारतीय संघासाठी काही चांगले क्षण होते, परंतु जागतिक कसोटी क्रमवारीत नंबर वन असलेल्या आर अश्विनला न खेळवण्यामागचं कारण मला समजलं नाही.  

मी सामन्यापूर्वी सांगितल्याप्रमाणे, कुशल फिरकीपटू नेहमी वळणाऱ्या ट्रॅकवर अवलंबून नसतात, ते हवेतही चेंडू वळवतात आणि कोणत्याही खेळपट्टीवर कमाल करून दाखवतात. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या ८ फलंदाजांपैकी ५ डावखुरे होते, हे विसरून चालणार नाही.  

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धासचिन तेंडुलकरआर अश्विनभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
Open in App