Join us

Year Ender 2024 : सूर्याचा तो कॅच अन् हार्दिक पांड्यामुळं MI मधील गटबाजी! क्रिकेटमधील ५ वादग्रस्त घटना

एक नजर २०२४ मध्ये भारतीय क्रिकेटमध्ये वादग्रस्त ठरलेल्या ५ घटना ज्या चांगल्याच चर्चेत राहिल्या.   

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 11:25 IST

Open in App

भारतीय क्रिकेटसाठी हे वर्ष एकदम खास राहिले. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकण्यापासून ते क्रिकेटच्या छोट्या प्रकारात टीम इंडियाने नोंदवले मोठे विक्रम क्रिकेट चाहत्यांचा आनंद द्विगुणित करणारे होते. ज्या क्रिकेटच्या मैदानात 'अच्छे दिन' अनुभवायला मिळालं तिथं काही वादग्रस्त सीनही क्रिएट झाले. इथं जाणून घेऊयात २०२४ मध्ये भारतीय क्रिकेटमध्ये वादग्रस्त ठरलेल्या ५ घटना ज्या चांगल्याच चर्चेत राहिल्या.   टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सूर्यकुमार यादवचा अफलातून कॅच अन् त्यामुळे निर्माण झालेला वाद

यंदाच्या वर्षी झालेल्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात फायनल सामना रंगला होता. भारतीय संघाने सेट केलेल्या टार्गेटचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिला वहिला वर्ल्ड कप जिंकण्याच्या दिशेनं पाऊल टाकले होते. पण सीमारेषेवर सूर्यकुमार यादवनं एक अफलातून कॅच घेतला अन् या कॅचमुळे सामनाच फिरला. भारतीय संघानं याच कॅचच्या जोरावर दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावली. सोशल मीडियावर एका बाजूला या कॅचनं भारतीय चाहत्यांची मनं जिकंली. दुसऱ्या बाजूला एक गट असा होता ज्यांनी कॅचवर आक्षेप नोंदवला. सीमारेषेवर मॅच वेळीची बाउंड्री लाईन आणि त्याआधीची बाउड्री लाईनचा मार्क यामुळे कॅचवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. पण जे दावे झाले त्या फक्त अन् फक्त अफवा राहिल्या अन् सूर्याचा कॅच हा सर्वोत्तम कॅचपैकी एक ठरला.  श्रेयस अय्यर आणि इशान किशनसह अन्य खेळाडूंसदर्भातील BCCI ची भूमिका

Shreyas Iyer And Ishan Kishan

बीसीसीआयनं आपल्या वार्षिक करारातून श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांचा पत्ता कट केला. त्यानंतर २०२४-२५ च्या हंगामासाठी या स्टार खेळाडूंना उच्च-कार्यक्षमता कार्यक्रमात सामील करण्यात आले. संघातून वगळल्यानंतर त्यांच्या प्रगतीत सुधारणा करण्यावर दिला जाणारा भर  बीसीसीआयच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थितीत करणारा होता. एवढेच नाही तर काही खेळाडूंसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची सक्ती तर काही खेळाडूंना दिलेली मुभा या निर्णयावरही टीका झाली.  

हार्दिक पांड्यामुळं MI मधील गटबाजी चव्हाट्यावर

मुंबई इंडियन्सच्या संघानं गुजरातच्या ताफ्यात गेलेल्या हार्दिकला पुन्हा आपल्या संघात सामील करून घेतले. एवढेच नाही तर रोहित शर्माच्या जागी त्याच्याकडे कॅप्टन्सी आली. मुंबई इंडियन्सच्याा या निर्णयामुळे हार्दिक पांड्या खूपच ट्रोल झाला. मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या असे दोन गट पडल्याचे पाहायला मिळाले. या काळात हार्दिक पांड्यानं खूप काही सहन केले. चांगली गोष्ट ही की, वर्ल्ड कप स्पर्धेनंतर हार्दिक पांड्यावरील रोष कमी झाला. आता पुढच्या हंगामात तोच MI चे नेतृत्व करताना दिसणार असून रोहितही याच संघाचा भाग आहे. ही गोष्ट  संघातील वातावरण 'ऑल इज वेल' असल्याचे संकेत देणारी आहे. यापुढे चाहत्यांचा प्रतिसाद कसा मिळेल ते बघण्याजोगे असेल.

फीबी लिचफिल्डच्या विरोधातील LBW निर्णय ठरला वादग्रस्त 

 

Litchfield’s LBW Decision Reversal
आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात LBW च्या एका निर्णयामुळे मोठा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. शारजाहच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन बॅटर फीबी लिचफिल्ड (Phoebe Litchfield) हिने दिप्ती शर्माच्या गोलंदाजीवर रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न केला. तिचा हा प्रयत्न फसला अन् चेंडू पॅडवर आदळला. भारतीय संघाने केलेल्या अपीलनंतर मैदानातील पंचांनी लिचफिल्डला आउट दिले. ऑस्ट्रेलियन बॅटरनं रिव्ह्यू घेतल्यावर तिसऱ्या पंचांनी चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पडल्याचा दाखला देत निर्णय पलटला. या निर्णयावर भारतीय संघाची कॅप्टन हरमनप्रीत कौरनं नाराजी व्यक्त केली. बॅटरनं रिव्हर्स शॉट  ट्राय केल्यामुळे ही विकेट मिळायला हवी होती, असा युक्तीवाद भारतीय संघाकडून करण्यात आला. पण नियमानुसार हा निर्णय योग्यच होता. कारण फलंदाजाने कोणत्याही प्रकारे शॉट खेळण्याचा प्रयत्न केला तरी त्या फलंदाजाच्या शेलीनुसार ऑन आणि ऑफ साइडमध्ये कोणताही बदल होत नाही.  

IPL संस्थापक ललित मोदीच्या 'बोलंदाजी'नं माजली खळबळ  

IPL चे संस्थापक आणि माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी एका पॉडकास्टला दिलेली मुलाखत चांगलीच खळबजळ माजवणारी होती. या मुलाखतीमध्ये ललित मोदीनं चेन्नई सुपर किंग्सवर अनेक गंभीर आरोप केले. लिलावात खेळाडूंवर बोली लावण्याच्या सेटिंगपासून ते मैदानात मर्जीतील अंपायर निवडून मॅच फिक्सिंग करण्यात चेन्नई संघाचे मालक आघाडीवर होते, असा दावा ललित मोदीनं केला.   

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघइयर एंडर 2024भारतीय क्रिकेट संघसूर्यकुमार अशोक यादवहार्दिक पांड्यामुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्स