Join us  

ZIM vs IND : भारताची 'सुंदर' कामगिरी! झिम्बाब्वेकडून एकट्याने किल्ला लढवला; पण Team India वरचढ

ZIM vs IND 3rd T20 Live Match : भारताने तिसरा ट्वेंटी-२० सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 7:42 PM

Open in App

ZIM vs IND 3rd T20 Live Match Updates In Marathi | हरारे : झिम्बाब्वे दौऱ्यावर असलेल्या भारताच्या युवा सेनेने तिसरा ट्वेंटी-२० सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतली. शुबमन गिलच्या नेतृत्वातील टीम इंडिया पाच सामन्यांच्या मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. भारताने दिलेल्या १८३ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना यजमानांना अपयश आले. वॉशिंग्टनच्या 'सुंदर' गोलंदाजीच्या जोरावर भारताने सहज विजय मिळवला. झिम्बाब्वेकडून डायोन मायर्सने एकतर्फी झुंज दिली पण त्याला इतर फलंदाजांनी साथ न दिल्याने भारताचा विजय सोपा झाला. भारताने तिसरा सामना २३ धावांनी जिंकून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. 

भारताच्या घातक गोलंदाजीसमोर झिम्बाब्वेचा कोणताच फलंदाज टिकत नव्हता. पण, डायोन मायर्स याला अपवाद ठरला. त्याने आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा करताना १ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ४९ चेंडूत नाबाद ६५ धावा कुटल्या. त्याच्याशिवाय क्लाईव्ह मदांडे (३७) धावा करून बाद झाला. अखेर झिम्बाब्वेचा संघ निर्धारित २० षटकांत केवळ १५९ धावा करू शकला अन् २३ धावांनी सामना गमावला. टीम इंडियाकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर आवेश खान (२) आणि खलील अहमदला (१) बळी मिळाला.

तत्पुर्वी, भारताने यजमान झिम्बाब्वेला विजयासाठी १८३ धावांचे तगडे आव्हान दिले होते. भारताकडून शुबमन गिलने सर्वाधिक धावा केल्या, त्याने ३ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ४९ चेंडूत ६६ धावा केल्या. तर यशस्वी जैस्वाल (३६), अभिषेक शर्मा (१०), संजू सॅमसन (नाबाद १२) आणि रिंकू सिंह एक धाव करून नाबाद परतला. ऋतुराज गायकवाडने स्फोटक खेळी करताना ३ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने २८ चेंडूत ४९ धावा केल्या. अखेर टीम इंडिया निर्धारित २० षटकांत ४ बाद १८२ धावा करू शकली. झिम्बाब्वेकडून सिकंदर रझा आणि ब्लेसिंग मुजरबानी यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद.

दरम्यान, मालिकेतील पहिल्या सामन्यात ११५ धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला अपयश आले. मग यजमान झिम्बाब्वेने विजयी सलामी दिली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताकडून अभिषेक शर्माने शतकी खेळी केली, त्याला ऋतुराज गायकवाडने चांगली साथ दिली. भारताने झिम्बाब्वेसमोर २३५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना यजमानांना घाम फुटला अन् १०० धावांनी सामना गमावला. तिसरा सामना जिंकून भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. 

टॅग्स :भारत-झिम्बाब्वेशुभमन गिलऋतुराज गायकवाडवॉशिंग्टन सुंदर