Join us  

ZIM vs IND : भारताच्या विजयाचा चौकार! अखेरचा सामना मोठ्या फरकाने जिंकला; मुकेश कुमारचा दबदबा

ZIM vs IND 5th T20 : अखेरचाही सामना जिंकून पाहुण्या टीम इंडियाने ४-१ ने ट्वेंटी-२० मालिकेचा शेवट केला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 7:34 PM

Open in App

ZIM vs IND 5th T20 Match Updates | हरारे : टीम इंडियाला मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. पण, शुबमन गिलच्या नेतृत्वातील युवा सेनेने विजयाचा चौकार मारून शेवट गोड केला. अखेरच्या सामन्यात भारताने दिलेल्या १६८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यजमानांना घाम फुटला. यजमान संघाकडून डायोन मायर्स (३४) आणि फराज अक्रम (२७) वगळता एकाही फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. अखेर झिम्बाब्वेचा संघ निर्धारित षटकेही खेळू शकला नाही आणि १८.३ षटकांत सर्वबाद अवघ्या १२५ धावा करू शकला आणि ४२ धावांनी सामना गमावला. भारताकडून मुकेश कुमारने सर्वाधिक ४ बळी घेतले. टीम इंडियाकडून मुकेश कुमार (४), शिवम दुबे (२), अभिषेक शर्मा, वॉशिंग्टन सुंदर आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतले. 

तत्पुर्वी, इतर सर्व फलंदाज संघर्ष करत असताना संजू सॅमसनने मात्र धावांचा पाऊस पाडला. सुरुवातीला संथ मग स्फोटक खेळीने सॅमसनने झिम्बाब्वेसमोर सन्मानजक लक्ष्य उभे केले. भारताकडून यशस्वी जैस्वालने सर्वाधिक धावा केल्या, त्याने ४ षटकार आणि १ चौकाराच्या मदतीने ४५ चेंडूत ५८ धावा केल्या. त्याच्याशिवाय यशस्वी जैस्वाल (१२), शुबमन गिल (१३), अभिषेक शर्मा (१४), रियान पराग (२२), शिवम दुबे (२६) आणि रिंकू सिंग (११) धावा करून नाबाद परतला. अखेर भारतीय संघ निर्धारित २० षटकांत ६ बाद १६७ धावा करू शकला. झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुजारबानीने सर्वाधिक (२) बळी घेतले, तर सिकंदर रझा, रिचर्ड नगारवा आणि ब्रँडन मावुता यांना १-१ बळी घेण्यात यश आले.

खरे तर ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्याच चेंडूवर १३ धावा करणारा यशस्वी जैस्वाल हा जगातील पहिला खेळाडू ठरला. त्याने झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाच्या पहिल्या षटकातील पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. हा नो-बॉल असल्याने जैस्वालला फ्री हिटच्या रूपात आयती संधी मिळाली. मग आणखी एक षटकार मारून यशस्वीने एका चेंडूत १३ धावांची नोंद केली. पण, ज्या सिकंदरविरूद्ध यशस्वीने ऐतिहासिक कामगिरी केली त्याच जैस्वालला बाद करण्यात प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला यश आले. तो ५ चेंडूत २ षटकारांच्या मदतीने १२ धावा करून बाद झाला.

पाच सामन्यांच्या मालिकेतील सलामीचा सामना जिंकून यजमान झिम्बाब्वेने विजयी सलामी दिली होती. मात्र त्यानंतर विजयाची हॅटट्रिक मारून भारताने मालिका खिशात घातली. अभिषेक शर्मा, यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार शुबमन गिल चांगल्या फॉर्ममध्ये दिसले. दुसऱ्या सामन्यात अभिषेक शर्माने अवघ्या ४६ चेंडूत शतक झळकावण्याची किमया साधली. अखेरचाही सामना जिंकून पाहुण्या टीम इंडियाने ४-१ ने ट्वेंटी-२० मालिकेचा शेवट केला. 

भारतीय संघ -

शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रियान पराग, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे, मुकेश कुमार.

टॅग्स :भारत-झिम्बाब्वेसंजू सॅमसनटी-20 क्रिकेट