Rohit Sharma Team India, Ind vs Ban 2nd Test: अरेरे.... रोहितचा दुखापतीनेच 'खेळ मांडला'! तब्बल ९ वर्षांनी ओढवली 'ही' नामुष्की

रोहित शर्मा अंगठ्याच्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतूनही बाहेर

Rohit Sharma Team India, Ind vs Ban 2nd Test: रोहित शर्माला २२ डिसेंबरपासून मीरपूर येथे सुरू होणाऱ्या बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून माघार घ्यावी लागली आहे. BCCI ने आज अधिकृत घोषणा केली.

रोहित शर्मासह जलदगती गोलंदाज नवदीप सैनी यालाही दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून माघार घ्यावी लागली आहे. पहिल्या कसोटीला मुकलेला भारतीय कर्णधार आता ढाका येथील कसोटीलाही मुकणार आहे.

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहितच्या अंगठ्याला दुखापत झाली आणि त्यामुळेच तो बाहेर पडला. उपचारासाठी भारतात परतलेल्या रोहितला डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर कसोटी मालिकेतून वगळण्यात आले.

भारताने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे आणि शेवटच्या कसोटीत त्याच्या अनुपस्थितीत उपकर्णधार लोकेश राहुल संघाचे नेतृत्व करेल. पण असे असताना, रोहित शर्माची एक यशस्वी मालिका मात्र खंडित होणार आहे.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. अंगठ्याच्या दुखापतीमुळे हा खेळाडू तिसरी वनडे आणि पहिली कसोटी खेळू शकला नव्हता. आता दुसऱ्या कसोटी सामन्यातूनही तो बाहेर पडल्यानंतर रोहितची २०१३ पासून सुरू असलेली मालिका खंडित होणार आहे. नक्की काय आहे ती गोष्ट, जाणून घ्या.

रोहित हा असा फलंदाज आहे, जो त्याच्या झंझावाती फलंदाजीसाठी ओळखला जातो, परंतु यावर्षी म्हणजेच २०२२ मध्ये या फलंदाजाने भारतासाठी एकही शतक झळकावलेले नाही. २०१३ नंतर रोहितने एका वर्षात एकही शतक न झळकावण्याची ही पहिलीच वेळ आहे. म्हणजेच तब्बल ९ वर्षांनंतर एका वर्षात प्रथमच रोहित शतकाविना वर्षाला अलविदा करणार आहे.