Team India Review Meeting: वर्ल्डकप कसा जिंकायचा? रोहित-राहुलच्या उपस्थितीत BCCI ची महत्वाची बैठक, ३ निर्णयांवर शिक्कामोर्तब!

Team India Review Meeting: रॉजर बिन्नी यांच्या अध्यक्षतेखाली आज बीसीसीआयची रिव्ह्य मिटिंग झाली. यात तीन महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतीय क्रिकेट संघानं नव्या मिशनला सुरुवात केली आहे. २०२२ मध्ये भारतीय संघाचं पुन्हा एकदा वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं. त्यासोबतच संघासमोर आणखीही काही अडचणी वाढल्या आहेत. याच सर्व अडचणींच्या पार्श्वभूमीवर आज नववर्षात बीसीसीआयची एक महत्वाची बैठक झाली. ज्यात भारतीय क्रिकेट संघाची कामगिरी, आगामी रणनिती आणि इतर महत्वाच्या गोष्टींवर सविस्तर चर्चा झाली.

मुंबईत बीसीसीआयच्या मुख्यालयात रिव्ह्यू मिटिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली आणि यात सचिव जय शहा, कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक राहुल द्रविड, एनसीएचे संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण आणि मुख्य निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांची उपस्थिती होती.

बीसीसीआयच्या बैठकीत २०२२ मध्ये भारतीय संघानं केलेली कामगिरी, ट्वेन्टी-२० वर्ल्डकप २०२२ मध्ये झालेला पराभव यासोबतच वर्ललोड मॅनेजमेंट, फिटनेस पॅरामीटर आणि वनडे वर्ल्डकप २०२३ साठीची तयारी या विषयांवर चर्चा झाली.

उदयोन्मुख खेळाडूंना आता स्थानिक मालिकांमध्ये सातत्यपूर्ण पद्धतीनं खेळावं लागेल. जेणेकरुन राष्ट्रीय संघाच्या सिलेक्शनसाठी ते लवकर तयार होऊ शकतील असा निर्णय घेण्यात आला.

दुसरं म्हणजे यो-यो चाचणी आणि डेक्सा सिलेक्शन प्रोसेसचा भाग असतील. सीनिअर टीमच्या पूलमधील खेळाडूंनाही ही चाचणी लागू केली जाईल असा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

वन डे वर्ल्डकप २०२३ आणि इतर सीरिज पाहता एनसीए सर्व आयपीएल फ्रँचायझींसोबत चर्चा करणार आहे. जेणेकरुन खेळाडूंच्या वर्ललोड मॅनेजमेंटबाबत निर्णय घेता येतील.

बीसीसीआयच्या या बैठकीची बऱ्याच कालावधीपासून वाट पाहिली जात होती. कारण ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमधील पराभवानंतर भारतीय संघात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. हार्दिक पंड्या याच्याकडे ट्वेन्टी-२० संघाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. तर रोहित शर्मा वनडे आणि कसोटी संघाची कमान सांभाळू शकतो अशी चर्चा आहे.

इतकंच नव्हे, तर ट्वेन्टी-२० क्रिकेट प्रकारासाठी वेगळा प्रशिक्षक आणि सपोर्टिंग स्टाफ आणण्याचीही चर्चा आहे. अर्थात अधिकृतरित्या याबाबत कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. ३ जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी सीनिअर खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. तर वनडे सीरिजमध्ये सिनीअर खेळाडू उपलब्ध असणार आहेत. यानंतर नवी निवड समिती देखील तयार केली जाणार आहे. यातच ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधार पदाबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.