पाकिस्तानी ऑलराऊंडरला विराट नाही तर, या भारतीय फलंदाजाची वाटते भीती; केला खुलासा

पाकिस्तानच्या एका अष्टपैलू खेळाडूला एका भारतीय खेळाडूची भीती वाटत असल्याचा खुलासा त्यानं केला आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्मा हे टीम इंडियाचे दोन प्रमुख फलंदाज आहेत. विराटनं २००८मध्ये पदार्पण केलं आणि तो संघाचा नियमित सदस्य आहे. पण, रोहितला राष्ट्रीय संघातील स्थान पक्क करण्यासाठी सहा वर्ष लागली.

मात्र, त्यानंतर त्यानं मागे वळून पाहिले नाही आणि मर्यादित षटकांच्या संघात त्यानं त्याचं स्थान मजबूत केलं. कसोटी क्रिकेटमध्येही नुकतीच त्याची उप कर्णधार म्हणून निवड झाली. २०१९मध्ये त्याला कसोटी संघात सलामीला खेळवण्यात आले आणि आता त्याच्या कारकीर्दिला वेगळं वळण मिळालं.

भारत आणि पाकिस्तानचा सामना म्हटलं तर चाहते हा सामना पाहण्यासाठी कायमच तयार असतात. परंतु पाकिस्तानच्या एका अष्टपैलू खेळाडूला एका भारतीय खेळाडूची भीती वाटत असल्याचा खुलासा त्यानं केला आहे.

भारतीय टी २० संघाचा आणि एक दिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याची आपल्याला भीती वाटत असल्याचा खुलासा पाकिस्‍तान अष्टपैलू खेळाडू शादाब खान (shadab khan) याने केला आहे. ट्विटरवर विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यानं हा खुलासा केला.

ट्विटरवर प्रश्नोत्तरादरम्यान १४९ विकेट्स घेणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूला एका चाहत्यानं गोलंदाजी करण्यासाठी सर्वात कठीण खेळाडू कोणता आहे असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना पाकिस्तानी खेळाडूनं विराट कोहली नाही तर, रोहित शर्मा याचं नाव घेतलं.

२०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शादाबनं रोहित शर्मा व्यतिरिक्त डेव्हिड वॉर्नर याचंही नाव घेतलं. वॉर्नर आणि रोहित शर्मा यांना गोलंदाजी करणं कठीण असल्याचा शाबादनं म्हटलं.

दरम्यान, एका युझरनं मिश्किलपणे त्याला तुमच्या टुथपेस्टमध्ये मीठ आहे का? असा प्रश्न केला. शादाबनंही यावर मिश्किल उत्तर देत माहित नाही, खाऊन पाहिलं नाही, असं उत्तर दिलं. याशिवाय चॅम्पिअन्स ट्रॉफीचा अंतिम सामना आपला आवडता होता असंही त्यानं म्हटलं.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ चा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला, त्या सामन्यात पाकिस्तानने १८० धावांनी विजय मिळवला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ४ बाद ३३८ धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात भारतीय संघाचा डाव १५८ धावांवर गुंडाळला.