Virat Kohli vs Sunil Gavaskar: विराट कोहलीचं सुनील गावसकरांना नाव न घेता सणसणीत उत्तर, म्हणाला...

IND vs PAK, Asia Cup 2022: विराटने पाकिस्तान विरूद्ध ठोकलं दमदार अर्धशतक

Virat Kohli vs Sunil Gavaskar, IND vs PAK: टीम इंडियाचा रविवारी पाकिस्तान विरुद्ध खेळल्या गेलेल्या Asia Cup 2022 च्या सुपर 4 सामन्यात पाच गडी राखून पराभव झाला. या सामन्यात धडाकेबाज फलंदाज विराट कोहली याने दमदार अर्धशतक ठोकले, पण त्याचा उपयोग झाला नाही. त्यानंतर त्याने पत्रकार परिषद घेतली. त्यात त्याने नाव न घेता माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

काही दिवसांपूर्वी सुनील गावसकर यांनी विराट कोहलीच्या खराब फॉर्मबद्दल विधान केलं होतं की, विराट कोहलीसोबत २० मिनिटं मिळाली तर कदाचित ते विराटला फॉर्म परत आणण्यासाठी काही मदत करू शकतील. विराटने यावर त्यावेळी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. पण काल पत्रकार परिषदेत त्याने गावसकरांना शेलक्या शब्दांत टोला लगावला.

गावसकरांच्या विधानाबाबत विराट कोहलीने याच मुद्द्यावर अतिशय मोजक्या शब्दांत भाष्य केले. त्याने कोणाचेही नाव घेतले नाही. पण नाव न घेताही त्याने महान फलंदाज सुनील गावस्कर यांच्या विधानाचा हुशारीने संदर्भ दिला आणि वक्तव्य करत जोरदार प्रत्युत्तर दिले.

सुनील गावसकर विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल म्हणाले होते, "जर मला विराट कोहलीसोबत २० मिनिटे सराव सत्रात मिळाली तर कदाचित मी त्याला सांगू शकेन की त्याने काय करावे. कदाचित मी त्याला त्याचा फॉर्म परत मिळवून देण्यास मदत करू शकेन, त्याचा त्याला नक्कीच फायदा होईल. त्याला मी इतर काहीही सांगण्यापेक्षा ऑफ-स्टंप लाईनच्या समस्येबद्दल बोलेन."

"मी १४ वर्षांपासून खेळत आहे. २० मिनिटांनी फारसा फरक पडत नसतो, त्यामुळे त्या २० मिनिटांनी काही घडत नाही. माझ्या खेळावर कठोर परिश्रम करणे हे माझे काम आहे आणि मला ते संघासाठी नेहमीच करायचे आहे आणि यापुढेही मी ते करत राहीन. प्रत्येकजण आपापले काम करत आहे. संघाचा माझ्यावर विश्वास आहे, तोपर्यंत चेंज रूममध्ये काय होते ते आमच्यासाठी महत्त्वाचे असते. आम्ही त्याकडे सकारात्मकतेने पाहतो", असे विराट म्हणाला.

"लोकांची स्वतःची मते आहेत आणि मला त्याबद्दल काहीच हरकत नाही. एक व्यक्ती म्हणून माझ्या आनंदावर त्याचा परिणाम होत नाही. मी गोष्टी दुरुस्त करण्यासाठी थोडा वेळ घेतला. मला आता खूप आराम वाटत आहे. मी माझ्यावर होणाऱ्या आपेक्षांचा दबाव वाटून घेत नाही. मलाही माझ्या खेळाचा आनंद घ्यायचा आहे त्यामुळे मी दडपणाखाली खेळायला कधीच सुरुवात करणार नाही", असेही विराटने रोखठोकपणे सांगितले.