Ind vs SA T20 WC: विचित्र पण हवाहवासा योगायोग...! पुन्हा २०११ ची कहाणी, होता धोनी! आफ्रिकेकडून हरलेलो पण...

T20 World Cup 2022: भारताने तेव्हाही पाकिस्तान आणि आयर्लंडविरोधात विजय मिळविला होता. परंतू आफ्रिकेसोबत हरला होता.

विचित्र पण हवाहवासा योगायोग... दोन वर्ल्डकप, इंग्लंड तेव्हाही आयर्लंडकडून हरलेला, आताही. साऊथ आफ्रिका तेव्हाही जिंकलेली आणि कालही. आफ्रिकेने तेव्हाही दोन रन्सनी विजय मिळविलेला, कालही. भारताने तरीही वर्ल्डकप जिंकलेला अन्... आताही? का नाही. भारत पहिल्यांदाच नाही तर २०११ च्या वर्ल्डकपमध्येही आतासारख्याच परिस्थितीतून गेलेला. तेव्हा धोनी होता, म्हणून वर्ल्डकप जिंकलेला.

भारताने तेव्हाही पाकिस्तान आणि आयर्लंडविरोधात विजय मिळविला होता. परंतू आफ्रिकेसोबत हरला होता. भारत टी२० वर्ल्डकपच्या सेमीमध्ये जाणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. निराश होऊ नका. कालच्या पराभवात अशी गोष्ट लपली आहे, जी १५ वर्षांचा दुष्काळ संपवू शकते. टीम इंडिया २००७ नंतर पुन्हा एकदा विश्वचषकावर कब्जा करू शकते. असा इतिहास रिपीट होतोय, जो २०११ मध्ये झालेला. एक योगायोग असू शकतो, पण एवढे योगायोग कसे काय जुळून येतील?

तुम्हाला आठवत असेल २०११ चे वर्ष होते. ५० ओव्हरच्या वर्ल्डकपचा उत्सव सुरु होता. पाकिस्तान असाच भारताविरोधात उभा ठाकला होता. भारताने पाकिस्तानला चिरडले होते, पुढे इंग्लंडला हादरवणाऱ्या नेदरलँडचाही सुफडा साफ केला होता. पण द. आफ्रिकेने भारताला हरवले होते, दोन रन्सनी. आतापर्यंतचा हा प्रवास २०११ आणि २०२२ मध्ये सारखाच आहे. बरोब्बर १० वर्षांनी तोच विचित्र योगायोग बनलाय, फक्त तेव्हा धोनी होता, आता रोहित आहे.

2022 T20 विश्वचषकापूर्वी, भारताचे दोन सराव सामने होते, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड. 2011 च्या विश्वचषक स्पर्धेतही भारताने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध सराव सामना खेळला होता. 2011 च्या विश्वचषकात नेदरलँड आणि बांगलादेशचा संघ भारताच्या गटात होते. परिस्थीती सारखीच होती. परंतू भारत आफ्रिकेसोबत हरल्यानंतर विजयच मिळवत गेला होता. विश्वचषक देखील जिंकला होता. आताही तोच इतिहास रिपीट होण्याची शक्यता आहे...

भारताच्या या पराभवानंतर पाकिस्तानचे आता टी २० विश्वचषक सामन्याच्या सेमीफायनलमध्ये क्वालिफाय करण्याचे स्वप्न थोडे कठीण दिसत आहे. असं असलं तरी पाकिस्तानचा संघ पूर्णपणे या स्पर्धेतून बाहेर गेलाय असंही म्हणता येणार नाही. पाकिस्ताननं सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेचा पराभव करणं आवश्यक होतं.

झिम्बाव्बेविरोधातील बांगलादेशच्या विजयानंतर सुपर १२ मधील ग्रुप २ अधिकच थरारक झाला आहे. भारतीय संघाला आपले पुढील दोन सामने बांगलादेश आणि झिम्बाव्बेसोबत खेळायचे आहेत. तीन सामन्यांनंतर चार अंकांसह भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. भारतीय संघाचा नेट रनरेट +०.८४४ आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ दोन विजय आणि ५ गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे. त्यांचा नेट रनरेट +२.७७२ आहे.

पाकिस्तानला आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. पाकिस्तानला बांगलादेश आणि साऊथ आफ्रिका या दोन्ही संघांचा पराभव करावा लागेल. तसंच नेदरलँडच्या संघानं दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा पराभव केला तरी पाकिस्तानला फायदा होऊ शकतो. त्यांना नेट रनरेटकडेही लक्ष द्यावं लागणार असून त्यांना भारताच्या पुढे जावं लागेल. याशिवाय दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँडच्या सामन्यात पाऊस पडल्यासही पाकिस्तानला मदत मिळू शकेल.