Rohit Sharma Captaincy Record : २०१६नंतर टीम इंडिया झाली 'Number One'; रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मोडले गेले अनेक विक्रम

India vs West Indies, 3rd T20I Live Updates, Rohit Sharma Captaincy Record : भारताच्या ५ बाद १८४ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला ९ बाद १६७ धावा करता आल्या आणि भारताने १७ धावांनी हा सामना जिंकला. वन डे मालिकेपाठोपाठ रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने ट्वेंटी-२० मालिकेतही ३-० असे निर्भेळ यश मिळवले.

सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) व वेंकटेश अय्यर ( Venktesh Iyer) यांच्या ९१ धावांच्या भागीदारीने भारताच्या विजयाचा पाया रचला. हर्षल पटेलने ४ षटकांत २२ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. दीपक चहर ( २-१५), वेंकटेश अय्यर ( २-२३) व शार्दूल ठाकूर ( २-३३) यांनीही कमाल गोलंदाजी केली.

वेस्ट इंडिजचे दोन्ही सलामीवीत पहिल्या तीन षटकांत दीपक चहरने माघारी पाठवले. पण, चहरला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. निकोलस पूरन व रोवमन पॉवेल ही डोईजड झालेली जोडी हर्षल पटेलनं तोडली. या जोडीनं २५ चेंडूंत ४७ धावांची भागीदारी केली. शार्दूल ठाकूरने अफलातून झेल घेताना पॉवेलला २५ धावांवर ( १४ चेंडू) चालते केले.

किरॉन पोलार्ड या मालिकेतच अपयशी ठरला आणि आजही तो केवळ ५ धावांवर बाद झाला. जेसन होल्डरही ( २) लगेच बाद झाला आणि पोलार्ड व होल्डर यांची विकेट वेंकटेश अय्यरने घेतली. पूरन व रोमारियो शेफर्ड ही जोडी फटकेबाजी करताना दिसली. पूरनने मालिकेतील सलग तिसरे अर्धशतक पूर्ण करताना विंडीजच्या विजयासाठी संघर्ष सुरूच ठेवला होता.

१८ चेंडूंत विजयासाठी ३७ धावांची गरज असताना शार्दूल ठाकूरला गोलंदाजीला आणण्याचा रोहितचा प्लान यशस्वी ठरला. शार्दूलनच्या संथ गतीने टाकलेल्या चेंडूवर निकोलस फसला अन् इशान किशनने अफलातून झेल टिपला. निकोलस ४७ चेंडूंत ८ चौकार व १ षटकार खेचून ६१ धावांवर माघारी परतला. शार्दूलने १८व्या षटकात ६ धावा देताना महत्त्वाची विकेट घेऊन सामन्याला कलाटणी दिली. हर्षलने १९व्या षटकात शेफर्डला २९ धावांवर बाद करून भारताचा विजय पक्का केला. वेस्ट इंडिजला २० षटकांत ९ बाद १६७ धावा करता आल्या.

तत्पूर्वी, श्रेयस अय्यर ( २५) व इशान किशन ( ३४) यांनी टीम इंडियाची गाडी रुळावर आणल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि वेंकटेश अय्यर या जोडीने चांगली फटकेबाजी केली. अय्यर १९ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३५ धावांवर नाबाद राहिला, तर अखेरच्या चेंडूवर सूर्यकुमार बाद झाला. त्याने ३१ चेंडूंत १ चौकार व ७ षटकारांसह ६५ धावा कुटल्या आणि भारताने ५ बाद १८४ धावांचा डोंगर उभा केला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली.

भारताचा हा सलग ९वा ट्वेंटी-२० विजय आहे. अफगाणिस्तान व रोमानिया यांच्या नावावर सलग १२ सामने जिंकण्याचा विक्रम आहे. पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतर रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने सलग तिसऱ्या मालिकेत निर्भेळ यश मिळवले आहे. त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका ३-० अशी जिंकली आणि वेस्ट इंडिजविरुद्ध वन डे व ट्वेंटी-२० मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवले.

भारताचा कर्णधार म्हणून पहिल्या २५ ट्वेंटी-२० सामन्यांत रोहित शर्माने सर्वाधिक २१ विजयांची नोंद केली आहे. त्यानंतर विराट कोहली ( १६) व महेंद्रसिंग धोनी ( १४) यांचा विक्रम येतो.

घरच्या मैदानावर सर्वाधिक ट्वेंटी-२० सामने जिंकणारा रोहित हा भारताचा यशस्वी कर्णधार ठरला आहे. त्याने १४ विजय मिळवताना विराट कोहलीचा १३ विजयांचा विक्रम मोडला. इंग्लंडचा इयॉन मॉर्गन ( १५), न्यूझीलंडचा केन विलियम्सन ( १५) व ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंच ( १४) हे आघाडीवर आहेत.

रोहितने चार वेळा प्रतिस्पर्धी संघांना ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये व्हाईट वॉश दिला आहे. ही भारतीय कर्णधाराची सर्वोत्तम कामगिरी आहे. याआधी त्याने श्रीलंका ( २०१७), वेस्ट इंडिज ( २०१८) व न्यूझीलंड ( २०२१) यांच्याविरुद्ध निर्भेळ यश मिळवले आहेत. पाकिस्तानचा सर्फराज अहमद ( ५) आणि अफगाणिस्तानचा अस्घर अफघान ( ४) यांच्यानंतर आता रोहितचा क्रमांक येतो.