भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंडमध्ये खेळतोय... पहिल्या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला यजमान इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला आहे आणि मालिकेतील दुसरा ट्वेंटी-२० सामना आज होणार आहे. तत्पूर्वी, भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधना ( Smriti Mandhana) हिने मोठा निर्णय घेण्याची तयारी दाखवली आहे.
स्मृतीने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २२१५, वन डेत २८९२ व कसोटीत ३२५ धावा केल्या आहेत. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताची ती आघाडीची फलंदाज आहे. कसोटीत तिच्या नावावर विक्रमी शतकही आहे. अशात तिने भारतीय क्रिकेटला अधिकाधिक वेळ देता यावा यासाठी फ्रँचायझी क्रिकेटकडे पाठ फिरवण्याचीही तयारी दर्शवली आहे.
भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आगामी महिला बिग बॅश लीग ( WBBL) मधून माघार घेण्याचा विचार करतेय. वर्क लोड मॅनेज करण्यासाठी आणि दुखापत टाळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अधिकाधिक योगदान देता यावे, यासाठी स्मृतीने हा निर्णय घेण्याचा विचार सुरू केला आहे.
२०२२ मध्ये फेब्रुवारीत न्यूझीलंड दौऱ्यानंतर मार्चमध्ये वन डे वर्ड् कप, एप्रिल- मे महिन्यात स्थानिक क्रिकेट, त्यानंतर जुन-जुलैमध्ये वन डे व ट्वेंटी-२० मालिकेसाठी श्रीलंका दौरा, जुलै-ऑगस्टमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असं सतत क्रिकेट स्मृती खेळतेय. बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने रौप्यपदकाची कमाई केली. त्यानंतर स्मृती इंग्लंडमध्ये महिलांच्या दी हंड्रेड लीगसाठी थांबली.
इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत सध्या ती खेळतेय. ती म्हणाली, ''वर्ल्ड कप स्पर्धेनंतर सातत्याने क्रिकेट सुरू आहे, परंतु कोरोना काळात फार क्रिकेट झालं नसल्याने मी सर्व सामने खेळण्यासाठी फिट राहण्याचा प्रयत्न करतेय. महिला क्रिकेट कमी होतंय, अशी तक्रार मला करायची नाही. पण, महिला क्रिकेटपटू म्हणून मला असंच वेळापत्रक हव होतं. त्यात आम्हाला आता मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती राखायची आहे. त्यामुळेच मी WBBL मधून माघार घेण्याचा विचार करतेय. दुखापतीमुळे भारताच्या एकाही सामन्याला मला मुकायचे नाही.''