ऑस्ट्रेलियाने रोहितसेनेला ४१ धावांनी हरविले तर...; पाकिस्तानींनी असे समीकरण जुळवले, टीम इंडिया बाहेर पडणार?

आज भारत वि. ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत रंगणार आहे. तर उद्या अफगाणिस्तान आणि बांग्लादेशमध्ये लढत रंगणार आहे.

अफगाणिस्तानसारख्या नवख्या संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चीत केले आहे. यामुळे क्रिकेटमध्ये काहाही होऊ शकते, हे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे. सुपर ८ मध्ये दुसऱ्या गटातून सेमीमध्ये जाणारे संघ ठरले असले तरी भारतीय संघ असलेल्या पहिल्या गटात अद्याप हे स्पष्ट व्हायचे आहे. अशातच सोशल मीडियावर असे समीकरण जुळविले गेले आहे की त्यात भारतीय संघ सेमीफायनलच्या स्पर्धेतून बाहेर जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त विद्यमाने 2024 सालचा टी २० वर्ल्डकप आयोजित करण्यात आला आहे. सुरुवातीचे सामने अमेरिकेत खेळविले गेले होते, येथील खेळपट्टी गोलंदाजांना साथ देणारी असल्याने भारतासह अनेक संघांना १००-११० रन्स पार करणेदेखील कठीण होऊन बसले होते. परंतू ही स्पर्धा जसजशी वेस्ट इंडीजमध्ये शिफ्ट झाली तशी धावसंख्या १७०-१८० पार करू लागली आहे.

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका सुपर-8 च्या ग्रुप-2 मधून पात्र ठरले आहेत. ग्रुप १ मध्ये अद्याप काही लढती बाकी आहेत. त्यातच ऑस्ट्रेलियाने धक्कादायक पराभव नोंदविल्यानंतर तर समीकरण आणखीनच कठीण झाले आहे.

भारतीय संघ 4 गुणांसह आणि +2.425 च्या धावगतीने पहिल्या क्रमांकावर आहे. तरीही भारत सेमी फायनलमध्ये पोहोचेल याची हमी देता येणार नाहीय. काय आहे हे समीकरण जे भारतीय संघाला सेमीत जाण्यापासून रोखू शकते...

आज भारत वि. ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत रंगणार आहे. तर उद्या अफगाणिस्तान आणि बांग्लादेशमध्ये लढत रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाला पराभत केल्याने अफगाणिस्तानचा जोश हाय आहे. तर बांग्लादेश आणि ऑस्ट्रेलियाच्या पराभवाने त्यांचा जोश कुठच्या कुठे पळून गेलेला आहे.

भारत सेमी बाहेर जाण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानला मोठ्या धावफरकाने जिंकावे लागणार आहे. पाकिस्तानी फॅन्स आता भारत कसा बाहेर जाईल याचेच गणित घालत बसले असून हे समीकरण व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलिया आज ४१ रन्सनी जिंकला तर नेट रनरेटमध्ये भारत मागे जाईल. तसेच ४ गुण घेत पहिल्या स्थानी जाईल. यामुळे भारत दुसऱ्या स्थानावर घसरेल. याचबरोबर आणखी एक चमत्कार होणे गरजेचे आहे.

ग्रुप-1 मधील शेवटचा सामना अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात होत आहे. यात अफगाणिस्तानला ८१ रन्सनी बांग्लादेशवर मात करावी लागणार आहे. असे झाले तर त्यांचेही ४ गुण होतील आणि नेट रनरेटनुसार तो दुसऱ्या स्थानी जाईल. म्हणजेच भारत तिसऱ्या स्थानावर जाईल आणि सेमीत पोहोचू शकणार नाही.

टीम इंडिया सेमीआधीच बाहेर जाण्याची शक्यता खूप कमी आहे. याचे कारण आहे पाऊस. या दोन्ही सामन्यांवर पावसाचे संकट आहे. तसेच जरी ऑस्ट्रेलियाने विजय मिळविला तरी अफगाण काही पुन्हा असा पराक्रम करू शकेल असे वाटत नाही. तरीही क्रिकेट आहे, ज्या संघाने ऑस्ट्रेलियाला पाणी पाजले तो संघ बांग्लादेशला हरवू शकतो. आणि आज जर ऑस्ट्रेलिया हरला तर पाकिस्तानींचे स्वप्न अधुरेच राहणार आहे.