"ते क्रमवारीत पुढे असले तरी..."; बांगलादेशी कॅप्टनचे भारताला चॅलेंज, पाकिस्तानची काढली लाज

India vs Bangladesh 1st Test: १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी बांगलादेशचा संघ भारतात दाखल

Najmul Hossain Shanto, Bangladesh Tour of Team India: भारताविरूद्धच्या २ कसोटींच्या मालिकेसाठी (IND vs BAN Test Series) बांगलादेशचा संघ भारतात दाखल झाला. १९ सप्टेंबरपासून चेन्नईत पहिली कसोटी खेळली जाईल. त्याआधी बांगलादेशचा कर्णधार शान्तो याने मालिकेबाबत मोठे विधान केले.

नजमुल होसेन शान्तो म्हणाला, "मैदानात उतरताना आम्ही विजयाच्या विचारानेच उतरू यात वाद नाही. पण आम्हाला आताच फार पुढचा विचार करायचा नाही. आम्हाला पाचही दिवस चांगले क्रिकेट खेळायचे आहे आणि आमचे सर्वोत्तम प्रयत्न करायचे आहेत."

"प्रत्येक क्रिकेट मालिका ही एक संधी असते. आम्हाला भारताविरूद्धच्या दोनही कसोटी जिंकायच्या आहेत. त्यासाठी आम्हाला एक प्रक्रिया फॉलो करावी लागेल. आम्ही प्लॅनिंगप्रमाणे योग्य खेळ दाखवला तर निकाल नक्कीच चांगला असेल."

"कसोटीच्या पाचव्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात निकाल लागावा असा खेळ आम्हाला खेळायचा आहे. कारण त्या सत्रात सामना कुठल्याही दिशेल झुकू शकतो. भारतात पहिला विजय मिळवायची आमच्यासाठी तीच संधी असू शकेल."

"भारताविरूद्धची मालिका आव्हानात्मक आणि कठीण असेल यात वादच नाही. पण आम्ही पाकिस्तानात जिंकलेल्या मालिकेमुळे आमच्यात अधिकचा आत्मविश्वास आला आहे. आमच्या संपूर्ण देशाला आमच्यावर विश्वास आहे."

"भारताचा संघ कसोटी क्रमवारीत आमच्यापेक्षा खूप पुढे आहे. पण आम्ही नुकतेच पाकिस्तानला हरवून आलो आहोत. कसोटी सामन्यांच्या संपूर्ण पाच दिवसांच्या वेळेत दर्जेदार क्रिकेट खेळायचं हे आमचे मुख्य उद्दिष्ट्य आहे."