भारत-इंग्लंड ( India vs England Test Series) यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत टीम इंडियानं २-१ अशी आघाडी घेत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( ICC World Test Championship) अंतिम सामन्याच्या दिशेनं पाऊल टाकलं आहे.
भारतानं चौथी कसोटी ड्रॉ राखल्यास त्यांचा अंतिम सामन्यातील प्रवेश निश्चित होईल. पण, इंग्लंडनं विजय मिळवल्यास ऑस्ट्रेलिया थेट अंतिम सामन्यासाठी पात्र होईल. त्यामुळे चौथ्या कसोटीत चुरस पाहायला मिळेल.
दक्षिण आफ्रिका दौरा रद्द केल्यामुळे ऑस्ट्रेलियाविरोधात आयसीसीकडे तक्रार दाखल केली गेली आहे. त्यामुळे आयसीसीनं कारवाई केल्यास, ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्याच्या शर्यतीतून बाद होईल.
त्यामुळे टीम इंडिया अंतिम सामन्यात खेळण्यासाठी पात्र ठरल्यास BCCIची डोकेदुखी वाढणार आहे. जून महिन्यात लॉर्ड्स मैदानावर न्यूझीलंडविरुद्घ हा अंतिम सामना होणार आहे. पण, त्यामुळे बीसीसीआयला आयपीएल २०२१च्या वेळापत्रकात मोठा बदल करावा लागणार आहे.
''आयपीएल २०२१च्या वेळापत्रकावरून सध्या बऱ्याच चर्चा सुरू आहेत. आम्हाला अनेक गोष्टींचा विचार करून आयपीएलच्या फायनलची तारीख ठरवावी लागेल. WTC फायनल याचाही आम्हाला विचार करावा लागणार आहे,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं InsideSport.co ला सांगितले.
आयपीएल २०२१ ची फायनल ६ जूनला खेळवण्याचा बीसीसीआयचा निर्धार होता, पंरतु त्यांना ३० मेच्या आत आयपीएल संपवावी लागणार आहे. त्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू WTC फायनलसाठी इंग्लंडला रवाना होतील.
१८ जूनला ही फायनल होणार आहे आणि कोरोना नियमांमुळे त्यांना क्वारंटाईन कालावधी पूर्ण करण्यासाठी आधीच इंग्लंडमध्ये पोहोचावे लागेल.