IPL 2023 New Rules: एक नाही, दोन प्लेईंग इलेव्हन! आयपीएल टॉसनंतर खेळाडू बदलता येणार; भन्नाट नवे नियम

आयपीएल स्पर्धा आणखी रोमांचक होण्यासाठी नियमांत बदल करण्यात येत आहे. आयपीएलपूर्वी एका देशाच्या २०-२० स्पर्धेत काही नियम लागू होते.

आयपीएलला आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. आयपीएल स्पर्धा आणखी रोमांचक होण्यासाठी नियमांत बदल करण्यात येत आहे. जेव्हा कॅप्टन टॉस उडविण्यासाठी मैदानात येतील तेव्हा त्यांच्या हातात दोन प्लेईंग इलेव्हनची यादी असणार आहे. टॉस उडविल्यानंतर कॅप्टनना त्यापैकी प्लेईंग इलेव्हन कोण असेल हे जाहीर करता येणार आहे.

आयपीएलमध्ये नवीन नियम लागू होणार आहेत. यामध्ये पहिला महत्वाचा नियम म्हणजे टॉस उडवून झाल्यानंतर प्लेईंग ईलेव्हन जाहीर करता येणार आहे.

आतापर्यंत कॅप्टनना टॉस पूर्वीच त्यांच्या टीमच्या खेळाडूंची यादी द्यावी लागत होती. परंतू, टॉस जिंकणार किंवा हरणार यावर पुढील परिस्थीत बदलते, यामुळे कप्तानाला त्याच टीमला घेऊन खेळावे लागत होते. ही एकप्रकारची अडचणच होती. ती आता आयपीएलमध्ये दूर करण्यात आली आहे.

यापुढे कॅप्टन टॉस नंतरच्या परिस्थितीनुसार संघ निवडू शकणार आहेत. या नियमामुळे इम्पॅक्ट प्लेअरना निवडण्याची कॅप्टनना मदत मिळणार आहे.

आयपीएलपूर्वी दक्षिण आफ्रिकेची एसए20 लीग पार पडली. यामध्ये संघांना नाणेफेकीनंतर त्यांची प्लेइंग इलेव्हन घोषित करण्याची सुविधा देण्यात आली होती. नाणेफेकीनंतर त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा करण्यापूर्वी संघांनी संघाच्या पत्रकावर 13 नावे दिली होती. म्हणजेच 11 खेळाडू खेळत असून दोन खेळाडूंना इम्पॅक्ट प्लेयर म्हणून ठेवण्यात आले होते.

संध्याकाळच्या सामन्यांमध्ये, दुसऱ्या डावात दवाचा प्रभाव वाढतो. यामुळे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला गोलंदाजी करणे कठीण होते. या नव्या नियमामुळे टॉस नंतर प्लेअर बदलता येणार आहे. यामुळे जर दुसऱ्या डावात स्पिनरची आवश्यकता असेल तसा खेळाडू निवडता येणार आहे. फलंदाज हवा असेल तर तसा खेळाडू निवडता येणार आहे.

टूर्नामेंट समितीने आधीच 'इम्पॅक्ट सबस्टिट्यूशन' (प्रभावी खेळाडूची जागा) जाहीर केली आहे. यानुसार पाच निवडलेल्या बदली खेळाडूंमधून सामन्यादरम्यान नवीन खेळाडू बदलला जाऊ शकणार आहे.

निर्धारित वेळेत षटके पूर्ण करू न शकणाऱ्या संघांना विलंब झालेल्या प्रत्येक षटकासाठी 30 यार्डच्या बाहेर फक्त चार क्षेत्ररक्षक ठेवण्याचा दंड आकारला जाईल.

यष्टिरक्षकाने काही चुकीचे केले तर चेंडू डेड घोषित केला जाईल आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला पाच अतिरिक्त धावा मिळतील.

क्षेत्ररक्षकाने काही चूक केली तरी चेंडू डेड घोषित केला जाईल आणि पाच धावांचा दंड आकारला जाईल.