IND vs Sl: "युवा आहेत, नो-बॉलसारख्या चुका होतातच", पराभवानंतर राहुल द्रविड यांनी दिले स्पष्टीकरण

IND vs Sl, 2nd T20: सध्या भारत आणि श्रीलंका यांच्यात ट्वेंटी-20 मालिकेचा थरार रंगला आहे.

सध्या भारत आणि श्रीलंका यांच्यात ट्वेंटी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. गुरूवारी या मालिकेतील दुसरा सामना पुणे येथे पार पडला. मालिकेतील दुसरा सामना जिंकून पाहुण्या श्रीलंकेच्या संघाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.

खरं तर या मालिकेतील पहिला सामना जिंकून यजमान संघाने विजयी सलामी दिली होती. कालच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अनेक चुका केल्या ज्याचा फायदा श्रीलंकेला झाला. युवा गोलंदाज अर्शदीप सिंगने एकाच षटकात 2 नो-बॉल टाकून प्रतिस्पर्धी संघाला धावा करण्याची आयती संधी दिली.

पुण्यात झालेल्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने दमदार पुनरागमन करत 16 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 20 षटकांत 206 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताला केवळ 190 धावा करता आल्या. वेगवान गोलंदाज अर्शदीपवर त्याच्या खराब गोलंदाजीमुळे पुन्हा एकदा टीका होत आहे.

अर्शदीप सिंगने भारतासाठी 19 वे षटक टाकले. या षटकात वेगवान गोलंदाजाने 18 धावा दिल्या. अर्शदीपने या षटकात 2 नो-बॉल केले. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.

सामन्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला, "नक्कीच आमच्याकडून काही चुका झाल्या आहेत, कारण निर्णायक वेळी नो-बॉल टाकणे हे एखाद्या गुन्ह्यापेक्षा कमी नाही."

हार्दिकच्या वक्तव्यानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे गोलंदाजांचा बचाव करताना दिसले. खासकरून अर्शदीपचा बचाव करताना द्रविड यांनी भाष्य केले. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत द्रविड म्हणाले, "आमचे वेगवान गोलंदाज युवा आहेत, वाईड किंवा नो-बॉलसारख्या चुका होतात, आपल्याला संयम बाळगावा लागेल आणि ते खरोखर चांगले शिकत आहेत."

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात श्रीलंकेने भारताचा 16 धावांनी पराभव केला. भारतासमोर विजयासाठी 207 धावांचे लक्ष्य होते, पण टीम इंडियाला निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून केवळ 190 धावा करता आल्या.

भारताकडून अक्षर पटेल आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतक झळकावून झुंज दिली. मात्र, त्यांना संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले. अक्षर पटेलने अवघ्या 21 चेंडूत अर्धशतकी खेळी करून भारतीय चाहत्यांना जागे केले.

अक्षर पटेलने 31 चेंडूत सर्वाधिक 65 धावांची खेळी केली. त्यानंतर सूर्यकुमार यादवने 36 चेंडूत 56 धावांचे योगदान दिले. तत्पुर्वी, श्रीलंकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. श्रीलंकेकडून कर्णधार दासुन शनाका आणि कुसल मेंडिस यांनी अर्धशतकी खेळी खेळली.

भारतीय गोलंदाजांनी खराब कामगिरी करताना अनेक धावा दिल्या. या सामन्यादरम्यान अर्शदीपने एकूण 5 नो-बॉल टाकले. तर शिवम मावी आणि उमरान मलिक यांनी प्रत्येकी एक नो-बॉल टाकला. तिन्ही वेगवान गोलंदाजांनी मिळून 138 धावा दिल्या.

लक्षणीय बाब म्हणजे तिसऱ्या आणि निर्णायक ट्वेंटी-20 सामन्यासाठी भारतीय संघात बदल होणार नसल्याचे संकेत देखील प्रशिक्षक द्रविड यांनी दिले आहेत.