Rohit Sharma Virat Kohli: विराट कोहली बद्दलच्या प्रश्नावर संतापला रोहित शर्मा; म्हणाला, "काही फरक पडत नाही..."

रोहित असं का अन् कोणासाठी म्हणाला... वाचा सविस्तर

Rohit Sharma Virat Kohli: टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे. भारताने टी२० मालिका जिंकली असली तरी विराटला या संपूर्ण मालिकेत केवळ १२ धावाच करता आल्या.

कसोटी असो की टी-२०, विराट कोहलीच्या बॅटमधून मोठी खेळी निघतच नसल्याने त्याला प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळेल की नाही, असे प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहेत. अलीकडेच माजी कर्णधार कपिल देवसह इतर दिग्गजांनी विराटबद्दल प्रश्न उपस्थित केले होते.

पण टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने उघडपणे विराट कोहलीचे समर्थन केले आहे. "बाहेर काय चालले आहे याने आम्हाला काही फरक पडत नाही", असे रोहितने स्पष्टपणे सांगितले आहे.

रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० संपल्यानंतर पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्याने विराट कोहलीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. विराटबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना रोहित शर्मा म्हणाला, "आमच्यासाठी ही कठीण परिस्थिती अजिबातच नाही. कारण आम्हाला बाहेरून बोलणारे ऐकू येत नाहीत."

"क्रिकेट तज्ञ, जाणकार, एक्स्पर्ट लोकं कोण आहेत, त्यांना एक्स्पर्ट का म्हणतात? ते बाहेरून खेळ पाहत आहेत. आत काय चालले आहे याची त्यांना कल्पना नाही. आमची एक प्रक्रिया असते. आम्ही एक संघ बनवतो."

"संघाबद्दलचे निर्णय खूप विचार करून घेतले जातात. आम्ही आमच्या सहकाऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहतो. बाहेरच्या लोकांना या गोष्टी माहीत नसतात. त्यामुळे बाहेर काय होते ते आपल्यासाठी महत्त्वाचे नसते."

"आपल्या संघात काय घडते ते आपल्यासाठी महत्त्वाचे असते. प्रत्येकाचा फॉर्म वर-खाली होत जातो, पण खेळाडूची गुणवत्ता कधीच वाईट नसते. आम्ही खेळाडूच्या गुणवत्तेचे समर्थन करतो."

"माझा खराब फॉर्मदेखील चिंतेचा विषय झाला होता. हे प्रत्येकासोबत घडते. एवढी वर्षे एखादा खेळाडू एवढी चांगली कामगिरी करत असेल, तर एक-दोन वर्षांच्या कालावधीसाठी त्याच्या कामगिरीत फरक पडू शकतो."

"अनेक वर्षे दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूने काही काळ वाईट खेळ केला तर त्याच्या चांगल्या कामाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपण संघात आहोत, संघाची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळे आपल्याला माहित आहे की तो खेळाडू किती महत्त्वाचा आहे", अशा शब्दांत रोहितने विराटची पाठराखण केली.