BCCI ची रणनीती! सूर्या-राहुल मैदानात; पुन्हा ऋतु'राज', पाया मजबूत करण्यासाठी 'पाऊल'

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गजांना या स्पर्धेतून वगळण्यात आले.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दुलीप ट्रॉफी २०२४ साठी चार संघाची घोषणा केली. वरिष्ठ खेळाडू युवा खेळाडूंच्या नेतृत्वात खेळताना दिसतील. मात्र, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गजांना या स्पर्धेतून विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला.

विशेष बाब म्हणजे भारताच्या ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार आहे. त्यामुळे साहजिकच सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यात आणखी भर म्हणजे, लोकेश राहुलही शुबमन गिलच्या नेतृत्वात खेळेल.

शुबमन गिल, अभिमन्यू ईश्वरन, ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर हे चार कर्णधार असतील. देशांतर्गत क्रिकेटमध्ये लाल-बॉल क्रिकेटची सुरुवात करणाऱ्या दुलीप ट्रॉफीमध्ये काही आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेले शिलेदारही दिसतील.

ही स्पर्धा ५ सप्टेंबर २०२४ पासून सुरू होईल. आंध्र प्रदेश आणि बंगळुरू येथे सामने खेळवले जातील. शुबमन गिल, लोकेश राहुल, कुलदीप यादव, शिवम दुबे आणि तिलक वर्मा हे एकाच संघात आहेत, तर रिषभ पंत, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज आणि यशस्वी जैस्वाल हे ब संघात आहेत.

आंतरराष्ट्रीय पातळीवर टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिलेदारांना बीसीसीआयने आवर्जुन देशांतर्गत क्रिकेटकडे ओढल्याचे दिसते. इशान किशनने देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास विरोध केल्याने त्याला केंद्रीय करारातून वगळण्यात आले होते. मात्र, तो आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळताना दिसेल.

अ संघ - शुबमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, लोकेश राहुल, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, विद्वथ कावेरप्पा, कुमार कुशाग्र, शास्वत रावत.

ब संघ - अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, सर्फराज खान, रिषभ पंत, मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चहर, साई किशोर, मोहित अवस्थी, एन नटराजन.

क संघ - ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल, सूर्यकुमार यादव, बी इंद्रजित, हृथिक शौकीन, मानव सुतार, उमरान मलिक, व्यशक विजयकुमार, अंशुल खंबोज, हिमांशू चौहान, मयंक मार्कंडेय, आर्यन जुयाल, संदीप वॉरियर.

ड संघ - श्रेयस अय्यर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिकल, इशान किशन, रिकी भुई, सारांश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेंगुप्ता, केएस भरत, सौरभ कुमार.

१९ सप्टेंबरपासून टीम इंडिया मायदेशात बांगलादेशविरूद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे दुलीप ट्रॉफीच्या स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूला बांगलादेशविरूद्धच्या मालिकेत संधी मिळाल्यास त्याच्या जागी नव्या चेहऱ्याला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची संधी मिळेल. नितीश रेड्डीची उपलब्धता फिटनेसवर अवलंबून आहे.