एकेकाळचे टीम इंडियाचे 'मॅचविनर,आता दोघेही बराच काळ संघाबाहेर! निवृत्ती हाच शेवटचा पर्याय?

Team India: युवा खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीमुळे वरिष्ठांना संघात स्थान टिकवणे कठीण जात आहे

Team India: भारतीय क्रिकेट संघात रोज काही ना काही अपडेट येत असतात. युवा खेळाडूंचे पदार्पण आणि उत्कृष्ट कामगिरीमुळे वरिष्ठांना संघातून वगळले जाण्याची शक्यता निर्माण होत आहे. विशेषत: जे खराब फॉर्मशी झुंजत असतात, अशा खेळाडूंना संघात स्थान मिळवणे कठीण होऊन बसते.

गेल्या काही काळापासून टीम इंडियाचे दोन स्टार क्रिकेटपटू संघाबाहेर आहेत. एकेकाळी या दोन खेळाडूंच्या भरवशावर टीम इंडिया विजयाची स्वप्न पाहत असे, पण सध्या या दोन खेळाडूंना संघात स्थान मिळणे जवळपास अशक्य झाले आहे.

संघात मोठ्या संख्येने नव्या दमाच्या खेळाडूंचा भरणा होत आहे. यातील बहुतांश खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रतिभा दाखवून दिली आहे. त्यामुळे आता या दोन खेळाडूंपुढे निवृत्ती हाच शेवटचा पर्याय असल्याचे बोलले जात आहे.

एकेकाळी टीम इंडियासाठी मॅचविनरची भूमिका बजावणारा दमदार सलामीवीर म्हणजे शिखर धवन ( Shikhar Dhawan ). ३८ वर्षीय धवनला २०२२ पासून भारताकडून खेळता आलेले नाही. २०११ मध्ये पदार्पण करणाऱ्या धवनला आता संघात संधी मिळण्याची शक्यताही विरळच आहे. त्यामुळे तो लवकरच निवृत्तीची घोषणा करणार का? अशी चर्चा आहे.

२०१२ मध्ये टी२० फॉरमॅटमधून पदार्पण करणारा भुवनेश्वर कुमार ( Bhuvneshwar Kumar ) यालाही सध्या संघात स्थान मिळणे कठीण आहे. भुवीने सुरुवातीच्या काळात स्विंग गोलंदाजीने साऱ्यांचे लक्ष वेधले होते. पण आता त्याला संघात स्थान मिळताना दिसत नाही. त्यामुळे त्यालाही निवृत्तीशिवाय काहीच पर्याय उरलेला नाही का, असे म्हटले आहे.