T20 World Cup 2022 IND vs BAN: खरंच विराटनं FAKE FIELDING केली का? पाहा काय म्हणतो ICC चा नियम?

भारत विरुद्ध बांगलादेश हा सामना अनेक कारणांमुळे चर्चेचा विषय ठरला होता.

पावसाच्या व्यत्ययानंतर सुधारित लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन मैदानावर उतरलेल्या बांगलादेशचा गड कोसळला. लोकेश राहुलने अचूक थ्रो करताना लिटन दासला रन आऊट केले आणि त्यानंतर मोहम्मद शमीने दुसरा ओपनर नजिमूल शांतोला बाद केले. अर्शदीप सिंगने एका षटकात बांगलादेशला दोन धक्के देताना बांगलादेशवरील दडपण वाढवले. 

दरम्यान, पांड्यानेही एका षटकात दोन विकेट्स घेतल्या आणि सारे चित्रच बदलले. विराट कोहली व रोहित शर्मा प्रत्येक विकेटनंतर दमदार सेलिब्रेशन करताना दिसले. भारताने रोमहर्षक विजय मिळवून सेमी फायनलचे तिकिट जवळपास निश्चित केले आहे. पण, बांगलादेशच्या या पराभवाने पाकिस्तानचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. 

भारत विरुद्ध बांगलादेश हा सामना अनेक कारणांमुळे चर्चेचा विषय ठरला. नो बॉल कॉन्ट्रोव्हर्सी, पावसानंतर मॅच सुरू होण्यापर्यंतच्या कॉन्ट्रोव्हर्सीपासून फिल्डिंग कॉन्ट्रोव्हर्सीही या सामन्यात पाहायला मिळाली.

बांगलादेशचा संघ जेव्हा पाऊस पडण्यापूर्वी फलंदाजी करत होता, तेव्हा विराट कोहलीच्या एका चुकीमुळे भारतीय संघाला पाच धावांची पेनल्टी लागली असती. परंतु ती घटना पंचांच्या नजरेस पडली नाही आणि भारतीय संघ यातून सुटला.

डकवर्थ-लुईस पद्धतीनुसार टीम इंडियाने हा सामना पाच धावांनी जिंकला आणि पाच धावा पेनल्टी मिळाल्या असत्या तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. पावसापूर्वी लिटन दासनं तुफान फलंदाजी करत संघाला मोठी धावसंख्या करण्यास मदत केली होती.

भारताकडून अक्षर पटेल सातवी ओव्हर टाकत होता. त्याच ओव्हरमध्ये फलंदाजाने मारलेला चेंडू अर्शदीपकडे गेला आणि त्याने चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने फेकला. दरम्यान, चेंडू आपल्या हातात असून तो फेकत असल्याचे विराट कोहलीने दाखवून दिले.

परंतु यामुळे आयसीसीच्या नियमानुसार भारतीय संघाला फटका बसला असता. ही बाब पंचांच्या ध्यानी न आल्याने पाच धावांची पेनल्टी वाचली. आयसीसीच्या नियम 41.5.1 नुसार कोणताही फिल्डर जाणुनबुजून आपले शब्द किंवा ॲक्शननं फलंदाजाचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते चुकीचे आहे. अशातच बांगलादेशला पाच धावांची पेनल्टी मिळू शकली असती.

भारताच्या 184 धावांच्या प्रत्युत्तरात बांगलादेशने तुफानी खेळी केली. लिटन दास व नजमूल शांतो यांनी बांगलादेशला दमदार सुरुवात करून देताना 7.1 षटकांत 68 धावांची भागीदारी केली. पावसाचा व्यत्यय आला तेव्हा DLS ( डकवर्थ लुईस नियम) नुसार बांगलादेश 17 धावांनी आघाडीवर होता आणि सामना रद्द झाला असता त्यांना विजयी घोषित केले गेले असते. पण, पाऊस थांबला आणि बांगलादेशसमोर 16 षटकांत 151 धावांचे सुधारित लक्ष्य ठेवले गेले. भारताने 5 धावांनी ( DLS) सामना जिंकला. बांगलादेशने 6 बाद 145 धावा केल्या.