टी नटराजन ( T Natarajan ) - तामिळनाडूच्या या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा संस्मरणीय ठरला. नेटबॉलर ते थेट तीनही फॉरमॅटमध्ये पदार्पण करणारा भारताचा पहिला खेळाडू, असा प्रवास त्यानं त्या दौऱ्यावर पूर्ण केला. त्यानं पदार्पणाच्या वन डे सामन्यात ७० धावांत २, ट्वेंटी-२० सामन्यात ३० धावांत ३ आणि कसोटी सामन्यात ७८ धावांत ३ विकेट्स घेतल्या.
शुबमन गिल ( Shubman Gill) - पृथ्वी शॉच्या अपयशामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील दुसऱ्या कसोटीत शुबमन गिलला पदार्पणाची संधी मिळाली आणि मेलबर्न कसोटीत त्यानं ४५ व ३५* धावांची खेळी करून सर्वांचे लक्ष वेधले. गॅबा कसोटीत त्याच्या ९१ धावांच्या खेळीनं कसोटीतील त्याचे स्थान पक्के केले.
मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) - ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर प्रमुख गोलंदाज जायबंदी होत असताना टीम इंडियाला सिराज हा हिरा गवसला. मेलबर्न कसोटीत पदार्पणातच त्यानं ७७ धावांत पाच विकेट्स ( २-४० व ३-१७) घेत इतिहास रचला. ०-१ अशा पिछाडीवर असलेल्या टीम इंडियानं त्या सामन्यात कमबॅक केले.
शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur) - तांत्रिकदृष्ट्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी ही त्याची दुसरी कसोटी होती, परंतु कारकिर्दीच्या पहिल्या कसोटीत दुखापतीमुळे तो केवळ ११ चेंडू टाकून माघारी परतला होता. ब्रिस्बेन कसोटीत त्यानं गोलंदाजीतच नव्हे तर फलंदाजीतही कमाल केली. त्यानं ७ ( ३-९४ व ४-६१) विकेट्स घेतल्या शिवाय ६७ धावांची खेळी करताना वॉशिंग्टन सुंदरसह टीम इंडियाचा गड राखला.
वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sunder) - आर अश्विन जायबंदी झाल्यानं ब्रिस्बेन कसोटीत वॉशिंग्टनला पदार्पणाची संधी मिळाली. त्यानं ४ विकेट्स ( ३-८९ व १-८०) आणि ६२ व २२ धावा करताना भारताच्या ऐतिहासिक विजयात हातभार लावला.
अक्षर पटेल ( Axar Patel) - इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून अक्षरनं पदार्पण केलं आणि पहिल्याच सामन्यात ( २-४० व ५-६०) सात विकेट्स घेत इतिहास रचला. तीन सामन्यांत त्यानं २७ विकेट्स घेत सर्वांना थक्क केलं.
सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) - इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत त्यानं पदार्पण केलं, परंतु पहिल्या सामन्यात एकही चेंडू खेळण्याची संधी त्याला मिळाली नाही. त्यानंतर त्याला बाकावर बसवले गेले आणि पुढील सामन्यात पुन्हा घेतले. मग सूर्यानं ती संधी हेरली आणि ३१ चेंडूंत ५७ धावांची आक्रमक खेळी करून सर्वांची वाहवाह मिळवली.
इशान किशन ( Ishan Kishan) - इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यातून पदार्णप करत मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूनं ३२ चेंडूंत ५६ धावांची आक्रमक खेळी केली.
कृणाल पांड्या ( Krunal Pandya) - इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यातून कृणालनं पदार्पण केलं. हार्दिकच्या हातून त्याला पदार्पणाची कॅप देण्यात आली आणि वडिलांच्या आठवणीत तो भावूक झाला. त्यानं पदार्पणात सर्वात जलद ( २६ चेंडू) अर्धशतकाचा वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. ३१ चेंडूंत ५८ धावा करताना त्यानं लोकेश राहुलसह ५७ चेंडूंत ११२ धावांची भागीदारी केली.
प्रसिद्ध कृष्णा ( Prasidh Krishna) - पहिल्या वन डे सामन्यात त्यानं ५४ धावांत ४ विकेट्स घेतल्या. पदार्पणाच्या वन डे सामन्यात चार विकेट्स घेणारा तो पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला.