शिखर धवन एक वेगळंच रसायन! "रडावं किंवा...", भारताच्या 'गब्बर'नं पुन्हा एकदा जिंकली मनं

shikhar dhawan retirement announcement : शिखर धवनने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

शांत, संयमी आणि निर्भय खेळीसाठी ओळखला जाणारा भारतीय क्रिकेटचा 'गब्बर' अर्थात शिखर धवन शनिवारी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्त झाला.

धवनने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत ही मोठी घोषणा केली. ३८ वर्षीय धवन आता केवळ आयपीएलमध्ये खेळताना दिसेल.

तो शेवटच्या वेळी डिसेंबर २०२२ मध्ये टीम इंडियातून खेळला होता. बांगलादेशविरूद्धचा वन डे सामना धवनच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरला.

शिखर धवनने आपला पहिला कसोटी सामना १४ मार्च २०१३ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. मोहालीच्या मैदानात डावाची सुरुवात करताना त्याने ८५ चेंडूत शतक झळकावून सर्वांनाच प्रभावित केले.

पदार्पणाच्या सामन्यातील या झंझावाती खेळीसह पदार्पणाच्या कसोटीत जलद शतकी खेळी करण्याचा विक्रम धवनने आपल्या नावे केला. हा एक विश्विक्रम आजही कायम आहे. मोहाली कसोटीत त्याने १७४ चेंडूत १८७ धावांची खेळी केली होती.

निवृत्ती जाहीर केल्यानंतर शिखर धवनने विविध बांबीवर प्रकाश टाकला. हा निर्णय घेणे माझ्यासाठी फार कठीण नव्हते. मी भावनिक देखील झालो नाही. रडावे किंवा आणखी काही करावे असेही मला वाटत नाही. मी सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल त्यांचा आभारी आहे, असे शिखरने सांगितले.

धवन पुढे म्हणाला की, मी माझे बरेच आयुष्य क्रिकेट खेळण्यात घालवले आहे. आताच्या घडीला मी अशा टप्प्यावर पोहोचले आहे की आता विश्रांतीची खूप गरज आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेऊन क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिला.

तसेच मी कसोटी क्रिकेटमध्ये ज्यापद्धतीने पदार्पण केले ती आठवण खूप खास आहे. मी भारतीय संघात येताच एका विक्रमाला गवसणी घातली. त्या सामन्यात १८७ धावा करू शकलो. भारतासाठी खेळायचे आणि नवीन विक्रम करायचे हे नेहमीच माझे स्वप्न राहिले आहे. मला विश्वविक्रमाची माहिती देखील नव्हती. पण, भारताच्या कसोटी संघात मला संधी मिळाली याचा खूप आनंद झाला होता, असेही धवनने नमूद केले. तो हिंदुस्तान टाइम्सशी बोलत होता.

दरम्यान, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील शिखर धवनची खेळी आजही चाहत्यांच्या मनात ताजी आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर राहिला.

भारतीय सलामीवीर शिखर धवनने ७०१ धावा करुन एकट्याने किल्ला लढवला होता. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सलग दोन वेळा गोल्डन बॅट जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे.