IPL 2021: तब्बल ३ ते ४ हजार कोटींना विकले जातील IPL चे दोन नवे संघ; नेस वाडियांनी सांगितलं संपूर्ण गणित...

IPL 2021: आयपीएलच्या पुढील सीझनमध्ये दोन नवे संघ दाखल होणार आहेत. यासाठीच्या लिलावाची जोरदार तयारी देखील बीसीसीआयनं केली आहे. या लिलावा संदर्भात एक मोठी माहिती पंजाब किंग्जचे सह-मालक आणि उद्योजक नेस वाडिया यांनी दिली आहे. काय म्हणाले नेस वाडिया जाणून घेऊयात...

पंजाब किंग्ज संघाचे (Punjab Kings) सह-मालक नेस वाडिया (Ness Wadia) यांच्या मतानुसार आयपीएलच्या (IPL) पुढील सीझनमध्ये सामील होणाऱ्या दोन नव्या संघांची किंमत कमीत कमी ३ ते ४ हजार कोटी इतकी असणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) दोन नव्या संघांबाबत विस्तृत माहिती २५ ऑक्टोबरच्या लिलावानंतरच दिली जाईल असं याआधीच स्पष्ट केलेलं आहे. पण आयपीएलमध्ये दोन नव्या संघांचा समावेश करण्याचा बीसीसीआयचा खूप चांगला निर्णय असल्याचं वाडिया म्हणाले.

"बीसीसीआयनं दोन नव्या संघांसाठी बेस प्राइज २ हजार कोटी इतकी ठेवली आहे. पण त्यापेक्षा ५० ते ७५ टक्क्यांनी अधिकच संघांची किंमत असेल. मला वाटतं प्रत्येक संघाची किंमत जवळपास ३ ते साडेतीन हजार कोटींपर्यंत जाईल", असं नेस वाडिया म्हणाले.

आयपीएलमध्ये दोन संघांच्या समावेशामुळे स्पर्धेला एक नवा आयाम मिळेल असं वाडियांना वाटतं. "दोन नवे संघ म्हणजे सामने वाढतात. सामने वाढले म्हणजे प्रेक्षकवर्ग वाढतो. आयपीएल स्पर्धा याआधीच एक मजबूत स्पर्धा आहे. त्यात दोन नव्या संघांमध्ये आणखी बळकटी मिळेल. याशिवाय नव्या क्रिकेटपटूंना जास्तीत जास्त संधी प्राप्त होईल, असं वाडिया म्हणाले.

आयपीएलला तर फायदा होईलच पण दोन नव्या संघांमुळे रोजगारही वाढेल. संघ वाढला म्हणजे व्यवस्थापन, नियोजन इतर गोष्टीही वाढतात. युवा खेळाडूंना संधी मिळते आणि त्यांना आर्थिक मदतही होते, असंही वाडिया यांनी सांगितलं.

डिसेंबरमध्ये आयपीएलचा मेगा लिलाव होणार आहे. यात सर्व फ्रँचायझींना केवळ मोजक्या खेळाडूंनाच रिटेन करता येणार आहे. इतर सर्व खेळाडूंचा लिलावात समावेश होणार आहे. मेगा लिलाव निष्पक्ष पद्धतीनं व्हायला हवं. विशेषत: दोन नव्या संघांच्या समावेशामुळे या लिलावाकडे वेगळ्या पद्धतीनं पाहायला हवं, असं नेस वाडिया म्हणाले.

आयपीएलच्या व्यवस्थापनाकडून अद्याप या लिलावासंदर्भात कोणतीही नियमावली किंवा कायदेशीरबाबींची माहिती देण्यात आलेली नाही. पण समोर आलेल्या माहितीनुसार प्रत्येक फ्रँचायझीला केवळ तीन खेळाडू रिटेन करता येणार आहे. संघातील इतर सर्व खेळाडूंचा लिलाव केला जाणार आहे.

पंजाब किंग्ज संघासाठी यंदाचं सीझन निराशाजनकच ठरलं आहे. संघाला १३ पैकी केवळ पाच सामने जिंकता आले आहेत. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात तर संघाला शेवटच्या षटकात विजयासाठी ४ धावांची गरज असूनही संघ जिंकू शकला नव्हता.

रॉयल चँलेंजर्स बंगलोर विरुद्धच्या सामन्यात देखील पंजाबचा संघ मजबूत स्थितीत होता. तरीही संघाला सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं. "संघाची कामगिरी नक्कीच निराशाजनक आहे. आम्हाला आणखी चांगली कामगिरी दाखवण्याची गरज आहे. पण मला पूर्ण विश्वास आहे की संघ नक्कीच यात सुधारणा करेल. संघातील प्रत्येकाला आपल्यावरील जबाबदारीची जाणीव आहे. खेळाडूंवर खूप दबाव असतो आणि त्यांना समजून घेणं खूप गरजेचं आहे", असं नेस वाडिया म्हणाले.