Virat Kohli IND vs ENG: १४ वर्षांत असं पहिल्यांदाच घडलं, विराट कोहलीच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

विराटचा फॉर्म भारतीयांसाठी चिंतेचा विषय

Virat Kohli IND vs ENG: भारतीय संघाने तिसऱ्या आणि निर्णायक वन डे सामन्यात इंग्लंडवर रोमहर्षक विजय मिळवला. भारताची वरची फळी अपयशी ठरल्यानंतर रिषभ पंत ( Rishabh Pant ) आणि हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) जोडीने दमदार खेळ केला.

हार्दिक पांड्याने ५५ चेंडूत ७१ धावांची खेळी केली. तर रिषभ पंतने नाबाद १२५ धावा ठोकत पहिलंवहिलं वन-डे शतक ठोकलं. या दोघांच्या दमदार कामगिरीमुळेच भारताला मालिका २-१ अशी जिंकता आली.

टीम इंडियाने अप्रतिम कामगिरी करत मालिका जिंकली असली, तरी भारतीय चाहत्यांसाठी चिंतेची बाब म्हणजे विराट कोहलीचा फॉर्म. याच विराट कोहली नावावर या मालिकेदरम्यान एक लाजिरवाणा पराक्रम घडला.

भारताचा माजी कर्णधार आणि एकेकाळचा रनमशिन सध्या काहीसा लय गमावलेल्या स्थितीत आहे. गेल्या सुमारे तीन वर्षांच्या कालावधीत विराटला एकही आंतरराष्ट्रीय शतक ठोकता आलेले नाही.

विराटला इंग्लंड विरूद्धच्या मालिकेतही सूर गवसला नाही. तो पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाला तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात त्याने अनुक्रमे १६ व १७ धावा केल्या.

विराटच्या १४ वर्षांच्या वन डे कारकिर्दीत पहिल्यांदाच विराटने सलग ५ सामन्यात २० पेक्षा कमी धावा केल्याची घटना घडली. विराटने गेल्या पाच वन डे सामन्यात अनुक्रमे ८, १८, ०, १६, १७ अशा खेळी केल्या. त्यामुळे एक लाजिरवाणा विक्रम त्याच्या नावावर नोंदवण्यात आला. (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)