Virat Kohli, IND vs SL, 2nd Test : शतक सोडा, ४३ धावा न केल्यास विराट कोहलीचं होईल मोठं नुकसान; तुटेल ६ वर्ष नावावर असलेला जगात भारी विक्रम

Virat Kohli, India vs Sri Lanka, 2nd Test : विराट कोहलीला 838 दिवस एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावता आलेले नाही. बंगळुरू कसोटीत तरी ती प्रतीक्षा संपेल अशी अपेक्षा आहे, परंतु 42 पेक्षी कमी धावा ही विराटसाठी धोक्याची घंटा आहे..

Virat Kohli, India vs Sri Lanka, 2nd Test : भारतीय संघाने पहिल्या कसोटी श्रीलंकेवर १ डाव व २२२ धावांनी विजय मिळवून दोन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. भारत-श्रीलंका दुसरी कसोटी १२ मार्चपासून बंगळुरू येथे खेळवण्यात येणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ( Royal Challengers Banglore) माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याच्या ७१व्या आंतरराष्ट्रीय शतकाची प्रतीक्षा येथे संपेल अशी चाहत्यांना आशा आहे. पण, शतक सोडा Pink Ball Test मध्ये विराटने ४२पेक्षा कमी धावा केल्यास, ६ वर्ष त्याच्या नावावर असलेला मोठा विक्रम धुळीस मिळेल.

विराटने २०१९मध्ये अखेरचं आंतरराष्ट्रीय शतक बांगलादेशविरुद्धच्या पिंक बॉल कसोटीत झळकावले होते. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या पिंक बॉल कसोटीत विराट हा दुष्काळ संपवेल अशी अपेक्षा आहे. मोहाली कसोटीत विराटने चांगला खेळ केला होता, परंतु ४५ धावांवर तो त्रिफळाचीत झाला. भारताने हा सामना डावाच्या फरकाने जिंकल्याने त्याला पुन्हा फलंदाजीची संधी मिळाली नाही.

विराट कोहलीच्या नावावर ६ वर्षांपासून एक मोठा विक्रम आहे आणि जगात हा विक्रम नावावर असलेला विराट हा एकमेव फलंदाज आहे. विराटने क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये ५०+ सरासरी कायम ठेवली आहे, परंतु आता त्याचा हा विक्रम संकटात आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत विराटने ४२ किंवा त्यापेक्षा कमी धावा केल्यास कसोटीतील त्याची सरासरी ५०च्या खाली येईल. सध्या त्याची कसोटी सरासरी ही ५०.३५ इतकी आहे. विराटला ८३८ दिवस आंतरराष्ट्रीय शतक झळकावता आलेले नाही. २०१९च्या कसोटी शतकानंतर त्याने २८.७५च्या सरासरीने धावा केल्या आहेत. ७०व्या शतकापर्यंत त्याची सरासरी ही ५४.९७ इतकी होती.

इंग्लंडविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर केलेल्या २३५ धावांच्या खेळीनंतर विराटने कसोटीत प्रथमच ५०+ सरासरी पार केली . त्यानंतर २०१९मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पुणे कसोटीतील २५४ धावांच्या खेळीने विराटने कारकिर्दीतील सर्वोत्तम ५५.१० ही सरासरी गाठली. मात्र, त्यानंतर त्याची सरासरी घसरत चालली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत विराटने ४३ किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या तरच त्याची कसोटीतील सरासरी ही ५०+ राहिल अन्यथा ६ वर्ष नावावर असलेला हा विक्रम मोडला जाईल. कसोटीत सध्या त्याची सरासरी ५०.३५, वन डेत ५८ .०७ आणि ट्वेंटी-२०त ५१.५० इतकी आहे.

सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सुनील गावस्कर यांनी चढ-उतारांच्या प्रवासानंतरही कसोटीतील सरासरी ५० च्या खाली येऊ दिली नाही. गावस्करांनी ५१.१२च्या सरासरीने धावा केल्या आहेत, तर तेंडुलकर व द्रविड यांची सरासरी ही अनुक्रमे ५३.७८ व ५२.३१ इतकी आहे.