यंदाच्या टी-२० विश्वचषकात दमदार कामगिरी करत भारतीय संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ७ धावांनी धूळ चारली आणि विश्वचषकावर आपलं नाव कोरलं.
२००७ नंतर भारताने पुन्हा एकदा टी-२० विश्वचषक जिंकल्याने देशभरात आनंदाचं वातावरण आहे. क्रिकेटप्रेमींनी रस्त्यावर उतरत फटाक्यांची आतषबाजी करत हा विजय साजरा केला.
विश्वचषक विजयानंतर टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत असताना बक्षिसांचाही वर्षाव झाला. बीसीसीआयकडून भारतीय संघाला तब्बल १२५ कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं.
मुंबईत झालेल्या व्हिक्टरी परेडवेळी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंकडे १२५ कोटी रुपयांचा चेक सुपूर्तही केला.
भारतीय संघातील खेळाडू, सपोर्ट स्टाफ, मुख्य प्रशिक्षक आणि निवड समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये ही रक्कम विभागून दिली जाईल, अशी माहिती जय शाह यांनी दिली होती.
टीम इंडियाला मिळालेल्या १२५ कोटी रुपयांच्या बक्षिसातील किती रक्कम कोणाला मिळणार, याबाबत चर्चा रंगत असताना आता इंडियन एक्स्प्रेसने एका वृत्तामध्ये याबाबतची माहिती दिली आहे.
या वृत्तानुसार, संघातील १५ खेळाडूंना प्रत्येकी ५-५ कोटी रुपये दिले जातील. तसंच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनाही ५ कोटी रुपये देण्यात येणार आहेत.
दुसरीकडे, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांना प्रत्येकी अडीच कोटी रुपये दिले जाणार आहेत.
भारतीय संघासोबत तीन फिजियो, ३ थ्रो डाऊन स्पेशालिस्ट, २ मसाज थेरेपिस्ट आणि कंडिशनिंग कोच यांनाही प्रत्येकी दोन कोटी रुपये देण्यात येणार आहेत.
अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय निवड समितीतील प्रत्येक सदस्याला १ कोटी रुपये मिळतील.
दरम्यान, भारतीय संघात रिंकू सिंह, शुभमन गिल, आवेश खान आणि खलील अहमद या चार राखीव खेळाडूंनाही प्रत्येक १ कोटी रुपये मिळणार असल्याचं बोललं जात आहे.