चौथ्या कसोटीतील पराभवाने भारत WTC Final च्या शर्यतीतून बाहेर झाला का? जाणून घ्या उत्तर

WTC Final Qualification Scenario for India and Australia: भारतीय संघाचा मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाने १८४ धावांनी पराभव केला. त्यासोबतच ऑस्ट्रेलियाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. आता भारतीय संघ ही मालिका जिंकू शकत नाही.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची चौथी कसोटी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळली गेली. पाचव्या दिवसापर्यंत चाललेल्या या सामन्यात शेवटच्या सत्रात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. भारताचा १८४ धावांनी झालेला हा जिव्हारी लागणारा आहे.

या पराभवानंतर WTC गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अंतिम फेरीत आपले स्थान आधीच निश्चित केले आहे. दुसऱ्या स्थानासाठी भारत, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात लढत आहे. मात्र मेलबर्न कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियाच्या आशांना मोठा धक्का बसला आहे.

या सामन्यात टीम इंडियासमोर ३४० धावांचे लक्ष्य होते, मात्र त्याचा पाठलाग करण्यात भारत अपयशी ठरला. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाने या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. अशा परिस्थितीत टीम इंडिया WTC Final च्या शर्यतीतून बाहेर पडली आहे का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

या प्रश्नाचे उत्तर असे की, भारत अजूनही WTC Finalच्या शर्यतीतून बाहेर झालेला नाही. पण यात छोटा ट्विस्ट असा की आता यापुढे अंतिम फेरीच्या पात्रतेचे भवितव्य भारताच्या स्वत:च्या हातात राहणार नाही. याचाच अर्थ टीम इंडियाला आता अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी श्रीलंकेची गरज भासणार आहे.

सर्वप्रथम भारतीय संघाला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा शेवटचा कसोटी सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. मेलबर्न कसोटीनंतर टीम इंडिया पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर कायम असली तरी PTC मध्ये भारताला धक्का बसला आहे. त्याची भारताला झळ बसू शकते.

भारताचे WTC 2023-25 शेड्युलमध्ये १८ सामन्यांमध्ये ९ विजय, ७ पराभव आणि २ अनिर्णित सामने आहेत. त्यामुळे भारताची विजयाची टक्केवारी आता ५२.७७ झाली आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने १६ कसोटींमध्ये १०वा सामना जिंकला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी ६१.४६ आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत बरोबरी साधण्यात भारताला यश आले तर ते WTC फायनलच्या शर्यतीत कायम राहतील. पण अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेवर भारताला लक्ष ठेवावे लागेल. त्यातही तीनही संघांना फायनलमध्ये पोहोचण्याची संधी आहे.

जर श्रीलंकेविरूद्ध ऑस्ट्रेलियाने दोन पैकी एक जरी सामना जिंकला, तर ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये जाईल. जर श्रीलंकेने ही मालिका १-० ने जिंकली, तर भारतीय संघ फायनलमध्ये जाईल. मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली तरीही ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये जाईल. पण श्रीलंकेने मालिका २-० ने जिंकल्यास श्रीलंका या दोन्ही संघांचा पत्ता कट करून स्वत: फायनलचे तिकीट मिळवेल.