तरुणाच्या हत्येप्रकरणी ६ आरोपींना अटक करत गुन्ह्याचा केला उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 09:58 PM2024-01-13T21:58:18+5:302024-01-13T21:58:31+5:30
पेल्हार, २ मध्यवर्ती आणि १ गुन्हे शाखा २ ने केली कारवाई
नालासोपारा (मंगेश कराळे) :- २७ वर्षाच्या तरुणाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अखेर २४ तासांच्या आत उलगडा केला आहे. पेल्हार पोलिसांनी ३ आरोपी पुण्यावरून पाठलाग करून पकडले आहेत. तर २ आरोपी मध्यवर्ती गुन्हे शाखेने व १ आरोपी गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या टीमने पकडले आहे. आरोपी विशाल आणि विकास यांनी पूर्ववैमनस्यातून कट रचून ही हत्या केल्याचे पोलीस तपासात आता उघड झाले आहे. पेल्हार पोलिसांनी सहाही आरोपींना अटक केले असून रविवारी वसई न्यायालयात हजर करणार आहे.
कांदिवलीच्या मारुती चाळीत राहणारा सुधीर सिंग (२७) आणि वालईपाडा रोडवरील उपाध्याय चाळीत राहणारा वैभव मिश्रा (२८) हे दोघे गुरुवारी गौराईपाडा परिसरात रूम बघण्यासाठी गेले होते. यावेळी आरोपींनी त्याचे अपहरण करून गौराईपाडा परिसरातील यादवेश विद्यालयाच्या बाजूला असलेल्या पार्किंगच्या मोकळ्या जागेत आरोपींनी अंगावर कोयता, दुसरे धारदार हत्याराने वार करून लाकडी बांबू व लाथाबुक्यांनी मारहाण करून जीवे ठार मारले होते. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात केली होती. आरोपींच्या शोधासाठी आणि या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी वरिष्ठ पोलिसांनी वेगवेगळ्या टीम बनवून आदेश दिले होते.
पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी आरोपी सूरज चव्हाण (२५), साहिल विश्वकर्मा (२१) आणि अखिलेश सिंग (२७) या तिन्ही आरोपींना पुण्याच्या सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंद नगर परिसरातून पळून जात असताना पाठलाग करून शिताफीने पकडले आहे. तर गुन्ह्याचे मुख्य सूत्रधार आणि कट रचणारे आरोपी सख्खे भाऊ विशाल (३५) आणि विकास (२४) या दोघांना मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने आरोपी सुरेंद्रकुमार पाल (२७) याला अटक केले आहे.
१) सुधीर सिंग याच्या हत्येप्रकरणी सहा आरोपींना अटक केली आहे. पूर्ववैमन्यसातून ही हत्या केली असून आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. दोन मुख्य सुत्रधारांनी कट रचून ही हत्या केल्याने या प्रकरणात १२० (ब) हे कलम वाढविण्यात आले आहे. - वसंत लब्दे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पेल्हार पोलीस ठाणे)