Arvind Kejriwal : बापरे! अरविंद केजरीवालांच्या रॅलीत चोरांनी साधला डाव; आपच्या 20 नेत्यांचे मोबाईल केले लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 10:56 AM2022-12-01T10:56:19+5:302022-12-01T11:08:19+5:30
Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या रॅलीमध्ये आता एक धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.
दिल्ली महानगरपालिका निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष राजधानीच्या विविध भागात सतत रॅली काढत आहेत. आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या रॅलीमध्ये आता एक धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. केजरीवालांच्या भव्यदिव्य रॅलीमध्ये चोरट्यांनी डाव साधला आहे. आपच्या 20 नेत्यांचे मोबाईल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी अरविंद केजरीवाल यांची दिल्लीतील मलका गंज परिसरात रॅली होती. या रॅलीमध्ये सामील असलेल्या 'आप'च्या अनेक नेत्यांपैकी 20 नेत्यांचे मोबाईल चोरीला गेल्याचं सांगण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त (नॉर्थ) सागर कलसी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मलका गंज भागातील आपच्या रॅलीत चोरट्यांनी काही आप नेत्यांचे मोबाईल चोरले आहेत.
आपचे आमदार अखिलेश त्रिपाठी, आप नेत्या गुड्डी देवी, आमदार सोमनाथ भारती यांचे सचिव यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. दिल्लीतील 250 वॉर्डांमध्ये 4 डिसेंबरला मतदान होणार असून 7 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.
अरविंद केजरीवाल याआधी रॅलीत म्हणाले होते की, 'तुम्ही फक्त तीन-चार महिन्यांत MCD भ्रष्टाचार मुक्त कराल, तुम्ही सत्तेत आलात तर माझे शब्द लक्षात ठेवा, तुम्हाला MCD मध्ये तुमचे काम करावे लागेल. त्यासाठी अतिरिक्त पैसा देण्याची गरज भासणार नाही. केजरीवाल यांनी मलका गंज चौक ते कमला नगरजवळील घंटा घर चौकापर्यंत रोड शो केला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"