बारावीची परीक्षा रद्द; पदवी, अन्य प्रवेश कसे होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:24 AM2021-06-06T04:24:44+5:302021-06-06T04:24:44+5:30
उस्मानाबाद-उमरगा : काेराेनाचे संकट लक्षात घेऊन शासनाने दहावी पाठाेपाठ बारावीच्या परीक्षाही रद्द केल्या आहेत. असे असले तरी या विद्यार्थ्यांना ...
उस्मानाबाद-उमरगा : काेराेनाचे संकट लक्षात घेऊन शासनाने दहावी पाठाेपाठ बारावीच्या परीक्षाही रद्द केल्या आहेत. असे असले तरी या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी काेणते निकष लावले जाणार? याबाबत कुठल्याही स्वरूपाचे धाेरण सरकारने अद्याप जाहीर केलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांतही आता चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
काेराेनाची पहिली लाट ओसरल्यानंतर दहावी, बारावीचे वर्ग सुरू झाले हाेते. त्यानुसार परीक्षा घेण्याचे नियाेजनही केले हाेते. परीक्षा केंद्रांसह भरारी पथकेही स्थापन करण्यात आली हाेती. असे असतानाच काेराेनाची दुसरी लाट येऊन धडकली. या लाटेत काेराेना बाधित रुग्णांसह मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. हे संकट निवळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर सुरुवातीला दहावीची परीक्षा रद्द केली. त्यामुळे बारावीच्या परीक्षेचे काय हाेणार? अशी चर्चा असताना शासनाने गुरुवारी ही परीक्षासुद्धा रद्द केली. त्यामुळे जिल्हाभरातील फ्रेशर व जुन्या अभ्यासक्रमाचे मिळून सुमारे १४ हजार ८९४ विद्यार्थ्यांसह पालकही चिंताग्रस्त झाले आहेत. कारण शासनाकडून अद्याप परीक्षेसाठी प्रविष्ठ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठीचे धाेरण जाहीर करण्यात आलेले नाही. उपराेक्त परिस्थिती लक्षात घेता, शासनाने तातडीने धाेरण जाहीर करावे, अशी मागणी हाेऊ लागली आहे.
बारावीनंतरच्या संधी...
बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमाला आणि पारंपरिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी, औषधीशास्त्र, प्रशासकीय सेवा, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, फाईन आर्ट्स, इंटरनेट डिझायनिंग, ग्राफिक डिझाईन, होम सायन्स, एअरपोर्ट मॅनेजमेंटसंबंधित कोर्स, बीफार्म, व्यावसायिक पायलट प्रशिक्षण, मर्चंट नेव्ही प्रशिक्षण आदी अनेक संधी उपलब्ध होतात.
काेट...
माझी मुलगी १२ वीच्या वर्गात असून तिचा बोर्ड तसेच नीट साठीचा अभ्यास पूर्ण झाला आहे. बोर्ड परीक्षेवर सध्याच्या स्थितीत ॲडमिशन राहिले नाही. त्यामुळे नीटची परीक्षा घेऊन ‘एमबीबीएस’साठी किंवा आयुर्वेदिकसाठी महाराष्ट्र शासनाने सीईटी परीक्षा घेऊन त्यावर आधारित बारावी बोर्डाचे मार्क मेमो देण्यात यावे.
- प्रा दगडू फुगटे, पालक, उमरगा
मी नीट परीक्षेची तयारी करीत आहे. नीटचा अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. मला असे वाटते की बोर्डाची परीक्षा रद्द होऊन चांगले झाले आहे. कारण आज-काल बोर्डाच्या परीक्षेवर इंजिनिअरिंग व मेडिकलसाठी ॲडमिशन नाहीत. आम्हांला नीटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी जास्तीचा वेळ मिळाला आहे. बोर्डाचे सर्टिफिकेट देण्यासाठी दहावी व अकरावीचे मार्क एकत्रित करून गुण द्यावेत.
- वैष्णवी फुगटे, विद्यार्थिनी, उमरगा.
बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत, निर्णय जरी कोविड अनुषंगाने घेतला असेल तरी यात काही त्रुटीही आहेत. जे विद्यार्थी नीट, जेईई आयआयटीच्या परीक्षा देतात, त्या विद्यार्थ्यांसाठी जरी बारावीच्या परीक्षा इतक्या महत्त्वाच्या नसल्या तरी इतर विद्यार्थी या परीक्षेवर अवलंबून आहेत. अनेक विद्यार्थ्यांसाठी बोर्डाची परीक्षा पुढील शिक्षणासाठी महत्त्वाची आहे. कारण बोर्डाच्या निकालावर विद्यार्थी आपल्या पुढील भविष्यातील शिक्षणाचा विचार करतात.
- प्रथमेश सोनी, विद्यार्थी, उमरगा
राज्य सरकारने बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे कोरोना संकटात होणाऱ्या परीक्षेमुळे चिंतेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, बारावीचा निकाल कसा लागणार? बारावीनंतरची प्रवेश प्रक्रिया कशी असेल? निकष काय असतील? असेल? विविध प्रश्न पालकांच्या मनात आहेत. त्यामुळे तातडीने धाेरण जाहीर करावे.
- मनीषकुमार सोनी, पालक, उमरगा.
बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. थोड्याच दिवसात विद्यार्थ्यांचे गुणांकन करून निकाल जाहीर केला जाईल. पुढील प्रवेशासाठी प्रवेश पूर्व पात्रता परीक्षा द्यावी लागेल. विद्यार्थ्यांना कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असेल तर संबंधित प्रवेशासाठी वेगळी प्रवेश पात्रता परीक्षा असेल. मग मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल अथवा अन्य. प्रत्येक कोर्ससाठी प्रवेश पात्रता परीक्षा द्यावी लागेल. बीए प्रथम, बीएससी प्रथम पारंपरिक कोर्सेससाठीसुद्धा प्रवेश पात्रता परीक्षा असेल. विद्यार्थ्यांनी सर्व प्रवेश पात्रता परीक्षेचे वेळापत्रक अवलोकन करून वेळीच विद्यार्थ्यांनी प्रवेश पात्रता परीक्षेसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसे केल्यास सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल.
- दिलीप गरुड, प्राचार्य, आदर्श महाविद्यालय, उमरगा.
बारावीची परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. बारावीनंतर राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या परीक्षा जेईई व नीटच्या रँकिंग ठरविण्यासाठी या परीक्षेचा उपयोग होतो. आता दहावीच्या मार्कवरून बारावीचे मार्क दिले जाणार. मात्र, दहावीत मिळालेल्या मार्कइतके मार्क बारावीत मिळणे कठीण असते. त्यामुळे कमी गुणवत्तेचा मुलगा राष्ट्रीय रेंजमध्ये उच्च पातळीत येऊ शकतो.
- प्रा. प्रभाकर कावळे, शिक्षक, श्री छत्रपती शिवाजी कॉलेज, उमरगा
१२ वीची परीक्षा रद्द केल्यामुळे पुढील प्रवेशास अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. प्रोफेशनल कोर्सेस सोडून इतर उच्च शिक्षण कोर्सला प्रवेश घेण्यासाठी याच मार्गाने बारावी विद्यार्थ्यांचा निकाल तयार करून व सीईटी घेऊन प्रवेश दिला जाऊ शकतो. इतर कोर्सेस जसे मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी यासारख्या कोर्सेससाठी प्रवेश परीक्षा घेऊनच विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यमापन केले जाऊ शकते. या बिकट परिस्थितीमध्ये शैक्षणिक गुणवत्ता टिकवणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
-गुंडा बापू मोरे, उपप्राचार्य, श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, उमरगा.
बारावी सायन्स विद्यार्थ्यांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचे वर्ष असते. विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारे हे वर्ष असते. बारावीनंतर सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे व्यवस्थित शिक्षण झालेले नाही. आता शासनाने बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. परीक्षा रद्द केल्यामुळे पुढील प्रवेशावर काही परिणाम होणार नाही.
-प्रा. व्ही. एम. पाटील, शिक्षण तज्ज्ञ.
काेराेनाच्या संकटाची तीव्रता लक्षात घेऊन शासनाने बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. शासनाचा हा निर्णय याेग्य आहे. मात्र, जेईई, नीट सारख्या परीक्षा रद्द करू नयेत. आवश्यक त्या उपायाेजना करून या परीक्षा घ्याव्यात. ज्यामुळे मेडिकल, इंजिनिअरिंगसारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणे साेयीचे हाेईल.
-प्रा. मन्मथ माळी, शिक्षक, आदर्श उच्च माध्य विद्यालय, उमरगा.